
कोपरगाव प्रतिनिधी
तालुक्यातील करंजी येथील आदिवासी बांधवांच्या स्मशानभूमी जागेचा ठराव २६ जानेवारी २०२० रोजीच्या ग्रामसभेत मंजुर करण्यांत आलेला आहे तेंव्हा याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी उगाचच श्रेय लाटु नये असे पत्रक उपसरपंच रविंद्र आगवण यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
त्यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, मौजे करंजी येथील आदिवासी बांधवांना माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शासनाच्या असंख्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे हया देखील प्रत्येक वेळी आढावा बैठक घेवुन प्रलंबित प्रश्न मार्गी लावतात. करंजी ग्रामपंचायतीच्या २६ जानेवारी २०२० रोजीच्या ग्रामसभेत दत्तू कचरू सोनवणे यांनी गावातील गट नं ६५५ हा ग्रामपंचायत मालकीचा असुन त्यात आदिवासी बांधवांसाठी स्मशानभूमी व्हावी म्हणून मागणी केली होती त्याप्रमाणे स्मशानभूमी जागेचा मुददा ग्रामसभेत घेवुन 40 आर क्षेत्रावर त्याची सातबारा सदरी नोंद करून त्याबाबतचा पुढील पत्रव्यवहार करून काम मार्गी लावावे असे ठरलेले असतांना आमदार आशुतोष काळे यांनी सोमवारच्या आढावा बैठकीत हे काम मार्गी लावण्याबाबत सुतोवाच केले ते बरोबर नाही. याबाबतचा सर्व पाठपुरावा करंजी ग्रामपंचायतीचे सदस्य पदाधिकारी यांचा आहे या प्रश्नांत भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी लक्ष घालून तो मार्गी लावला आहे असेही शेवटी रविंद्र आगवण म्हणाले.


