

कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील हरीसन ब्रँच रस्ता मनमाड, औरंगाबाद ह्या मुख्य रस्त्यांना जोडणारा आहे. हा रस्ता गावच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असुन दळणवळणासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो. हरीसन ब्रँच रस्त्याचे काही दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते मात्र गेल्या दोन वर्षांपासून समृद्धी महामार्गाच्या अवजड वाहनांची वाहतूक याच रस्त्याने होत असल्याने रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडले आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्डयात रस्ता हेच लक्षात येत नाही. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाहन चालवतांना कसरत करावी लागत होती. बऱ्याच वेळा छोटे मोठे अपघातही झाले आहेत. शाळकरी मुले व शेतकरी वर्गाला शेतमाल वाहतूक करणे जिकरीचे झाले होते. या रस्त्याची दुरावस्था पाहता सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे संचालक मधुकर वक्ते, माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण, संजय वक्ते यांनी राज कन्ट्रक्शनचे अधिकारी दत्ता माने, रणजित साहेब यांना याविषयी भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली व रस्त्याची समक्ष पाहणी करण्याचे आवाहन केले. यावर दत्ता माने यांनी स्वतः रस्त्याची दुरवस्था बघीतली व त्वरीत ग्रेडर मशीन व जेसीबीच्या सहाय्याने रस्ता दुरुस्त करून दिला. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाल्याने माजी संचालक मधुकर वक्ते, उपसरपंच जालिंदर चव्हाण, संजय वक्ते यांचे आभार मानले. यावेळी ग्रा.प. सदस्य भाऊसाहेब वक्ते, संजय वक्ते, प्रदीप गायकवाड, बाळासाहेब पवार, विजय वक्ते, राणा वक्ते आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.


