
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहरातील समतानगर व परिसरातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाल्यामुळे या खराब रस्त्यांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर मुरूम टाकून या रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजवावे अशा आशयाचे निवेदन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, समता नगर परिसरात पक्के रस्ते नसल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांचे खड्ड्यांमध्ये रूपांतर होते याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. विशेषत: शाळेत जाणारे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यांवर सर्वत्र पाणी साचत असल्यामुळे पायी चालणे देखील मुश्कील होऊन बसले आहे. साचलेल्या पाण्यामध्ये डबके तयार होऊन परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू अशा आजारांचे फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांचे आरोग्य हित व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन या रस्त्यावर ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यासाठी रस्त्यांवरील खड्यामध्ये मुरूम टाकावा व पावसाळ्यानंतर या रस्त्यांचे मजबुतीकरण करावे असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सचीव रेखा जगताप यांचेसह समतानगर येथील अश्विनी गायकवाड, रत्ना पाठक, भाग्यश्री मोरे, संगीता कापडे, यासीन पठाण, गंगुबाई जाधव, नयना फाटक, सरिता कापडे, सरला खालक,र आदींसह समता नगर व परिसरातील महिला रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


