
कोपरगाव प्रतिनिधी
क्षितिजावरची शब्दपर्णवी साहित्यिक मंच महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व कविसंमेलन सोहळ्याच्या निमित्ताने कवी,गझलकार तथा जीवन गौरव शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्याचे सहसंपादक साहित्यिक रज्जाक शेख यांना साहित्यिक योगदानाबद्दल राज्यस्तरीय ‘ मराठी साहित्यभूषण ‘ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या विशेष पुरस्कारासाठी निवड झाल्याचे निवडपत्र मंचाच्यावतीने नुकतेच प्राप्त झाले आहे.रविवार दिनांक १९ जून २०२२ रोजी मसिहा हॉल,बजाजनगर एम.आय.डी.सी.औरंगाबाद येथे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.पुरस्कारात आकर्षक सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र, शाल,आणि पुष्पगुच्छ यांचा समावेश आहे.सदर संमेलनाला अध्यक्ष कोकण साहित्य मंचाचे विठ्ठल धाडी,उद्घाटनक समाजसेविका संगीता जामगे,ग्रामीण साहित्यिक शिवाजी हुसे,डॉ.आनंद अहिरे,हबीब भंडारी, संस्थेचे संस्थापिका कल्पना निंबोकार,सचिव अनिल अंबुलकर,पत्रकार संजय येऊलकर,माणिक गोडसे,ज्ञानेश्वर नखाते,वंदना धकडे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. श्रीरामपूर येथील ग्रामीण साहित्यिक रज्जाकभाई शेख यांनी विविध राज्यस्तरीय संमेलनात आपल्या कवितेचे उत्तम सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली आहेत.शेख यांनी जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून वाचनलेखन चळवळीत सक्रिय राहून काम केले आहे. त्यांच्या बाराशेपेक्षा जास्त कविता विविध वृत्तपत्र, मासिके व दिवाळी विशेषांक यांत प्रकाशित झालेल्या आहेत.विनोदी कथा लेखनातूनही त्यांनी वाचकांना प्रेरणा दिली आहे. राज्यभरातून शेकडो काव्यसंमेलनात त्यांच्या कवितेची दखल घेतली गेली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थेकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षणाचा वारसा चालवताना मनातील भावनांना शब्दबद्ध करून कविता ,कथा लेख, यांचे लेखन तसेच हास्यकविता,लेख,हायकू,अभंग,प्रेमकविता,गझल,काव्यांजली,,अष्टक्षरी, गजल आदी काव्यप्रकारात लेखन केले आहे.आतापर्यंत अनेक वृत्तपत्रे व दिवाळी अंकातून कविता,कथा ,लेख व गझल यांना प्रसिद्धी मिळाली आहे.प्रवरा कम्युनिटी रेडिओ नभोवाणीवर व्याख्यान, कविता व मुलाखतीचे प्रसारण झालेले आहे.त्यांच्या कवितांना युट्युब, एसीबीएन न्युज,सी9 न्युज,अहमदनगर महानगर न्युज, पारनेर टाइम्स ,भारतीय जनमत पुणे आदी टेलिव्हिजन चॅनेलवर कविता व कार्यक्रम सादरीकरण केले आहे. वर्डसामना,शब्दरसिक,क्रांतिसूर्य,लक्ष्मीपुत्र, गोंदण,ग्रामसेवा,आसमंत काव्यप्रेमीचे,भगवानबाबा आदी दिवाळी अंकात तसेच त्यांच्या दर्जेदार कविता प्रतिलिपी,स्टोरीमिरर,लागीर झालं या ऍपवर सापडतात.ते जीवन गौरव शैक्षणिक मासिक सहसंपादक ,शब्दविद्या दिवाळी अंक उपसंपादक,काव्यदरबार बालकाव्य विशेषांक संपादक या पदावर ते साहीत्य चळवळीचे काम पाहतात .त्यांनी आतापर्यंत शंभरच्या वर कविसमेलनाच्या मंचावर कवितांचे सादरीकरण केले आहे. आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुजरात,अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद,आखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन पुणे,अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे त्यांच्या कवितांची निवड झाली आहे.काव्यक्षेत्रातील यशाबद्दल त्यांचा आतापर्यंत सत्याहत्तर वेळा व्यासपीठावर गौरव करण्यात आला आहे.शिरूर येथील राज्यस्तरीय कविसंमेलन आणि श्रीरामपूर येथील कविसंमेलनाचे ते माजी संमेलनाध्यक्ष आहेत.साहीत्य सन्मान निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


