कोपरगाव प्रतिनिधी
तालुक्याच्या पुर्व भागातील शेतक-यांचे यंदाचे रब्बी हंगामात प्रचंड नुकसान झाले, वीज वितरण कंपनीच्या भोंगळ आणि बेशिस्त कारभारामुळे पिकांना पाणी असुनही देता आले नाही त्यामुळे त्यांचे प्रचंड आर्थीक नुकसान झाले आहे, या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी दहेगांव बोलका, गोधेगांव, शिरसगांव, सावळगांव, तिळवणी आपेगांव आदि भागातील शेतकरी ग्राहक मंचाकडे वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरूध्द तक्रार दाखल करणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य त्रंबकराव सरोदे यांनी कळविले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षापासुन पर्जन्यमान ब-यापैकी आहे, कोपरगांवच्या पुर्व भागातील शेतक-यांना खरीप पीके काही प्रमाणात मिळाली परंतु नैसर्गीक आपत्तीमुळे ती देखील शेतक-यांच्या हातुन गेली. खरीपाचे नुकसान रब्बीत भरून निघेल या आशेवर शेतक-यांनी पदरमोड करून, दुबार कर्ज घेवुन रब्बी पिके लावली परंतु पीके एैन बहारामध्ये असतांना वीज वितरण कंपनीने वीज देण्यामध्ये हलगर्जीपणा केला, शेतक-यांना मुददामहुन त्रास देण्यांच्या हेतुने अनेक ठिकाणची वीज रोहित्रे बंद केली, वीज बिल वसुलीसाठी जाणिवपुर्वक त्रास दिला. ज्या शेतक-यांनी वेळेवर वीज बिले भरली त्यांनाही वीज वितरण कंपनीच्या लहरी कारभाराला सामोरे जावे लागले, पीकांना पाण्यांची गरज असतांना वीज न मिळाल्याने शेतक-यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला. याबाबत संबंधीत वीज वितरण कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी याची दखल घेतली नाही. दहेगाव बोलका, गोधेगांव, शिरसगांव, सावळगांव, तिळवणी, आपेगांव आदि भागातील शेतकरी या झालेल्या नुकसानीविरूध्द वीज वितरण कंपनीच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तकार दाखल करण्यात येणार आहे.


