Friday, April 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedशेतकऱ्यांच्या अंगणी हिंगणीचे पाणी !!- माधवराव पाटील

शेतकऱ्यांच्या अंगणी हिंगणीचे पाणी !!- माधवराव पाटील

कोपरगाव प्रतिनिधी

           पाण्याची किंमत जिरायती भागाला सर्वप्रथम समजते. कोपरगांव तालुका हा पूर्वीपासून अवर्षणग्रस्त, येथे पर्जन्यमान तुटपूंजे त्यामुळे भूगर्भातही पाण्याची पातळी खोलवर गेली, त्यासाठी पाणी – अडवा, पाणी जिरवा उपक्रमांतर्गत माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी साखर कारखान्याच्या माध्यमातून जलसंवर्धन मोहिम हाती घेत गोदावरी नदीवर त्यांनी सर्वप्रथम ८८ लाख रुपये खर्च करून १९८८ मध्ये सर्वात पहिला हिंगणी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला आणि शेतकऱ्याच्या अंगणी हिंगणीचे पाणी आले अशा शब्दात सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे माजी स्थापत्य अभियंता माधवराव पाटील यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ८९ गावात कोल्हे यांच्या अस्थींची रक्षा वृक्षारोपनाने कायम स्मरणात ठेवण्याचा उपक्रमही यावेळी पार पडला.  स्व. शंकरराव कोल्हे यांच्या अस्थींचे विसर्जन, गुरुवारी हिंगणी बंधाऱ्यात करण्यात आले. याप्रसंगी नितीनदादा कोल्हे, डॉ. मिलिंदराव कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, नाशिक मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलीमी वसंतराव पवार यांच्यासह संपूर्ण कोल्हे परिवार उपस्थीत होता. त्याप्रसंगी बिपीनदादा कोल्हे यांनी माधवराव पाटील यांना बोलावून घेतले होते. माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते.  श्री. माधवराव पाटील पुढे म्हणाले की, तुटीच्या पाण्याचे कधीच वाटप होत नसते त्यासाठी पाणी वाढविले पाहिजे ही शंकरराव कोल्हे यांची शिकवण असायची. तत्कालीन कार्यकारी संचालक व्ही. पी. नायडू, अंबादास अंत्रे, मोहनराव चव्हाण यांच्यासह साखर उत्पादनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अष्टप्रधान मंडळ कोल्हे यांच्या काळात कार्यरत होते, एकदा त्यांनी कामगिरी सोपवली किती बिनचूक करणेे आम्हा अष्टप्रधानमंडळाचे काम होतं, शंकरराव कोल्हेे यांनी संजीवनीच्या माध्यमातून गोदावरी नदीवर हिंगणी, मंजुर व सडे (संयुक्त) तीन कोल्हापूर पद्धतीचे तसेच छोट्या मोठ्या ओढयावर ४४ दगडी व सिमेंटचे, २७ कच्चे मातीचे अशी बंधारे बांधले. ९० शेततळी बांधत राज्यात सर्वात मोठी जलक्रांती शंकरराव कोल्हे यांनीच ऊभी केली. सध्याची संजीवनी अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन महाविद्यालयाची इमारत आहे त्याचे बांधकामासह, साखर कारखान्यांतील उपपदार्थ निर्माती प्रकल्प, गोदावरी दूध संघ इमारत, खिर्डी गणेश सपकॉम, यशवंत कुक्कुट इमारती त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधत आम्ही उभ्या केल्या. जनार्दन स्वामी मंदिर, शिव मंदीर, महर्षी शाळा, कित्येक रस्त्याची कामे आम्ही मार्गी लावली. जनतेसाठी ते ” नेते ” तर आमच्यासाठी ” साहेब ” होते. २४ मार्चला रोजी त्यांचा वाढदिवस होता, ते ९३ वर्षांचे पूर्ण झाले असते. त्याचा वाढदिवस बघायचा होता., पण नियतीला ते मान्य नसावे. कोल्हे यांचा आदरयुक्त दरारा ,प्रेम व धाक आम्ही कधी विसरू शकणार नाही, त्यांच्या नंतरची तिसरी पिढी आता अधिक तांत्रिक कार्यक्षमतेने काम करत आहे, यात अत्यानंद आहे, शंकरराव कोल्हे यांचे प्रत्येक कार्य अजरामर आहे, त्यांच्या विचारांची झेप पंचवीस ते तीस वर्ष पुढची असायची असेही माधवराव पाटील म्हणाले. माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांनी कोल्हे यांच्या प्रति श्रद्धा भाव व्यक्त करत त्यांच्यासमवेत केेलेला कामांच्या कार्याची आठवण करून दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!