
कोपरगाव प्रतिनिधी
राजमाता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई अशा अनेक कर्तुत्ववान महिलांच्या प्रेरणेतून प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत. ज्याच्याकडे गुणवत्ता आहे तो पुढे जातो त्यावेळी मुलगा किंवा मुलगी हे पाहिले जात नाही. अनेक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. असं एकही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी महिला कार्यरत नाहीत. त्यामुळे आपण एक महिला आहोत हा विचार मनातून काढून टाका आणि महिला कुठेही कमी नाहीत हे जगाला दाखवून द्या असा मौलिक सल्ला अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी दिला कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयात जागतिक महिला दिन कार्यक्रम व स्व.सौ. सुशिलामाई काळे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण सौ. चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले याप्रसंगी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, जग गतिमान झाले आहे त्यामुळे दोन वर्षापूर्वी आलेले जीवघेणे कोरोन संकट देखील या गतीमान विश्वाला थांबवू शकले नाही. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा देखील थांबल्या नाहीत त्या देखील ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या. त्यामुळे या गतीमान जगात प्रत्येकाला आपले उज्वल भविष्य घडवायचे आणि पुढे जायचे आहे. त्यावेळी आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांचा विसर पडू देवू नका व आपले पाय जमिनीवर ठेवा असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो त्याप्रमाणे यशस्वी स्त्रीच्या मागे देखील एका पुरुषाचा हात असतो हे देखील यापुढील काळात वक्त्यांनी आपल्या भाषणात नमूद करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कोपरगाव वकील संघाच्या अध्यक्षा अॅड. पुनम गुजराथी, प्राचार्य डॉ. रमेश सानप, सांस्कृतिक व वक्तृत्व स्पर्धा प्रमुख डॉ. बाबासाहेब शेंडगे, महिला समितीच्या चेअरमन डॉ. प्रतिभा रांधवणे, उपप्राचार्य डॉ. सुभाष रणधीर, डॉ. विजय निकम, डॉ. अरुण देशमुख, प्रा. रामभाऊ गमे आदींसह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
जागतिक महिला दिन व स्व.सौ. सुशिलामाई काळे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण प्रसंगी सौ. चैतालीताई काळे व मान्यवर.


