
कोपरगाव प्रतिनिधी
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मागील पाच वर्षात ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी चालना मिळाली. ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. त्याचबरोबर आजवर ज्या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले त्या रस्त्यांसाठी देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी मिळाल्यामुळे पाच वर्षात अनेक दुर्लक्षित रस्त्यांचा विकास झाला आहे असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील सोनारी येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ३० लक्ष निधीतून सोनारी-येसगाव-टाकळी-रवंदे ते जिल्हा हद्द रस्ता ९/५०० ते १५/३०० (इजिमा २१६) मध्ये डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार मोजक्याच मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता मिळाल्यानंतर कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात रस्ते विकासाचा अनुशेष मोठा होता. त्याचबरोबर अनेक रस्ते असे होते की, त्यांचा मागील काही वर्षात विकास झालेला नव्हता त्यामुळे नागरिकांना वर्षानुवर्ष अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यापैकी एक असलेला सोनारी-येसगाव-टाकळी-रवंदे ते जिल्हा हद्द रस्ता दुर्लक्षित होता.सोनारीच्या वडवस्तीच्या नागरिकांना दैनंदिन कामासाठी रवंदे येथे जावे लागते. तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या रस्त्यामुळे अनेक अडचणी होत्या. या अडचणी यापुढे दूर होणार असल्याचे समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वर्षापासूनचा दुर्लक्षित असलेल्या रस्त्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे यावेळी आभार मानले. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक अशोकमामा काळे, अरुण चंद्रे, जि.प. सदस्य सुधाकर दंडवते, पंचायत समिती सदस्य अनिल कदम,सुभाषर दवंगे, नूतन डेअरीचे संचालक शिवाजी घायतडकर, बाबासाहेब सांगळे,अर्जुन शेलार, दगडू सांगळे, चांगदेव घुगे,उत्तमराव भुसे, तान्हाजी कदम, उत्तम कदम,दत्तात्रय शिंदे, शांताराम सांगळे, नारायण कुटे,भाऊसाहेब सांगळे, आप्पासाहेब शेलार, गणेश कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
सोनारी येथे सोनारी-येसगाव-टाकळी-रवंदे ते जिल्हा हद्द रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन प्रसंगी आ. आशुतोष काळे समवेत मान्यवर.


