
कोपरगाव/प्रतिनिधी
सध्या कोरोनाचा नवीन प्रकार समोर आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ग्राहकाने मास्क लावले नाही तर दुकानदाराकडून दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचा आदेश काढला आहे. यामुळे दोन वर्षांपासून हतबल झालेल्या दुकानदारांसाठी हा अन्यायकारक ठरणार असल्याने शासनाने त्वरीत हा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.
नवीन कोरोना विषाणू प्रकारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने नवीन नियमावली लागू केली आहे. यामध्ये कठोर नियम असून दंड आकारण्यात येणार आहे. कुठल्याही व्यावसायिक आस्थापनात-दुकानात विनामास्क एक जरी ग्राहक आढळला तर आस्थापना चालकाला, दुकान मालकांकडून दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. हा अतिशय अन्यायकारक नियम असून ग्राहकांच्या चुकीची शिक्षा दुकान मालकाला, व्यापाऱ्यांना देणे पूर्णपणे चुकीचे आहे. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ असा प्रकार होऊ द्यायचा नसेल तर हा नवीन नियम शासनाने त्वरीत मागे घ्यावा. आधीच दोन वर्षात लहान-मोठ्या सर्वच व्यावसायिकांवर अरिष्ट कोसळलेले आहे. त्यात असा अन्यायकारक आदेश दिल्याने व्यावसायिकांचे कंबरडे मोडेल अशी भीती नगराध्यक्ष वहाडणे यांनी व्यक्त करून जनतेनेही कोरोनाचा पराभव करण्यासाठी मास्कचा न चुकता वापर करून सामाजिक अंतर ठेवावे असे आवाहन केले आहे.


