कोपरगाव प्रतिनिधी
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशिलामाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौतमनगर येथे संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास या विषयावर ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या या चर्चासत्रामध्ये डॉ.भास्कर जंगले (अभ्यास मंडळ अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे) व प्रा.डॉ. मल्लप्पां कोढनापुर (विजयापुर, कर्नाटक) यांनी मार्गदर्शन केले. हे चर्चासत्र वाणिज्य विभाग, अर्थशास्त्र विभाग अंर्तगत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी बोलतांना प्रा.डॉ.जंगले यांनी किफायतशीर शेतीसाठी शेती क्षेत्राला संरक्षण देणे गरजेचे असल्याचे सांगत त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये विमा संरक्षणाबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे. नैसागिक संसाधनाच्या माध्यमातून शाश्वत विकास साध्य करतांना नैसर्गिक संसाधनाचा अतिवापर केला गेला तर भावी पिढीला नैसागिक संसाधनाचा तुटवडा भासेल त्यासाठी शाश्वत शेती करतांना किफायतशीर शेतीकडे लक्ष देण्याची गरज असून केवळ उत्पादन वाढीवर भर न देता शेतमालाची किंमत स्थिर असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा.डॉ.मल्लप्पां कोढनापुर यांनी शेतीचा शाश्वत विकास करण्यासाठी गांडूळ खत निर्मिती,बहुपीक पद्धतीचा अवलंब, पॉलिकल्चर, सेंद्रिय शेती, जंगल शेती या सर्वाचा अवलंब करून शाश्वत शेती शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शेती उत्पादन वाढीवर भर देताना रासायनिक खते व औषधाचा सजीवांवर होणारे प्रतिकूल परिणाम पाहता सेंद्रिय शेती काळाची नितांत गरज असल्याचे त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.
प्रा.संतोष जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्राचार्या. डॉ. सौ. विजया गुरसळ यांनी स्वागत केले.महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी समन्वयक प्रा.विनोद मैंद व प्रा. पल्लवी मोरे यांनी आभार व्यक्त केले. प्रा.उमाकांत कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या चर्चासत्रामध्ये एकूण १०० प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांनी परिश्रम घेतले.


