Sunday, March 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोल्हे गटाने चर्चेत वेळ न घालवता, विकासकामे तातडीने सुरु करावी!! –विरेन...

कोल्हे गटाने चर्चेत वेळ न घालवता, विकासकामे तातडीने सुरु करावी!! –विरेन बोरावके

 कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहराच्या विकासात भर घालणारे २८ विकासकामांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाले आहे. मात्र ज्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी हि विकासकामे अडविण्यात धन्यता मानली त्यांनी आता चर्चेत वेळ घालविण्यापेक्षा तातडीने विकासकामे सुरु करण्याचा मार्ग मोकळा करावा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक गटनेते विरेन बोरावके यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात बोरावके यांनी पुढे असे म्हटले आहे की, न्यायालयात याचिका दाखल करून कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी अगोदरच शहरातील नागरिकांना आठ महिन्यापासून विकासापासून वंचित ठेवले आहे. नागरिकांचा वाढलेला रोष पाहून त्यांनी केलेल्या चुकीतून धडा घेत न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय घेण्याबाबत यापूर्वीच चर्चा झाली असून त्याबाबत चर्चासत्र घडवून आणले जात आहे. मात्र अगोदरच या विकासकामांना खूप उशीर झाल्यामुळे नागरिकांचा कोणताही दोष नसतांना त्यांना हा त्रास सहन करावा लागला आहे. यापूर्वी देखील या २८ विकासकामांबाबत अनेक बैठका व सखोल चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे आता तरी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी चर्चेत जास्त वेळ वाया घालवू नये व  सर्व रस्त्यांची कामे लवकरात लवकर सुरु करावीत.
कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी आ.आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या रस्त्यांसाठी २ कोटी तसेच छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते गोकुळनगरी या रस्त्यासाठी ८० लाख रुपयांचा निधी दिला आहे. या रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढून या रस्त्यांची कामे लवकरात लवकर कशी मार्गी लागतील यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने प्रयत्न करावे. त्याचबरोबर लुंबिनी बुद्धविहारकडे जाणारा रस्ता, नगर-मनमाड हायवे ते साईधाम,एस.एस.जी.एम.महाविद्यालयासमोरील रस्ता, आचारी हॉस्पिटल ते श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल, पंचायत समिती ते आठरे बंगला , श्री छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते धारणगाव रोड नागरे पेट्रोल पंप, मदरसा रस्ता तसेच कोपरगाव शहरातील इतर रस्ते व प्रत्येक प्रभागातील रस्त्यांची कामे थांबलेली असून या विकासकामांची गती वाढवा. शहरातील नागरिकांना होत असलेल्या त्रासाची जाणीव ठेवून जनतेचे होत असलेले हाल थांबविण्यासाठी चर्चेत वेळ न दवडता तातडीने २८ विकासकामे सुरु करा असे आवाहन नगरसेवक गटनेते विरेन बोरावके यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!