
जेऊर कुंभारी वार्ताहर
समृद्धी महामार्गावर आज सकाळी कंटेनरची उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. धडकेनंतर कंटेनरचे मोठे नुकसान झाले असून, या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीतही अडथळा निर्माण झाला. मात्र, प्रसंगावधान राखत तातडीने मदतीला धावून गेलेल्या जेऊर कुंभारीतील नागरिकांमुळे मोठा अनर्थ टळला.
सकाळच्या व्यायामासाठी जात असताना महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, लहाणू गायकवाड व संतोष गायकवाड यांच्या निदर्शनास हा अपघात आला. अपघाताची तीव्रता लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी तातडीने प्रयत्न केले आणि चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले.
अपघातग्रस्त चालकासाठी त्या क्षणी देवदूत ठरलेल्या या तिघांच्या तत्परतेचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. वेळेत मदत मिळाल्याने संभाव्य जीवितहानी टळली.
यावेळी बाळासाहेब वक्ते यांनी समृद्धी महामार्गावर वाहन चालविताना चालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. “समृद्धी महामार्गावर वेगाला मर्यादा असणे गरजेचे आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर राखावे आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांबाबत विशेष सतर्कता बाळगावी,” असा संदेश त्यांनी दिला.
एका अपघातग्रस्तासाठी वेळ न दवडता मदतीचा हात पुढे करत माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या बाळासाहेब वक्ते, लहाणू गायकवाड आणि संतोष गायकवाड यांच्या प्रसंगावधानाचे जेऊर कुंभारी परिसरातून कौतुक होत आहे.


