
कोपरगाव प्रतिनिधी
समाजातील गुणवंतांच्या कर्तृत्वाला दाद देत त्यांचा सन्मान करण्याबरोबरच ज्येष्ठांच्या कार्याचा गौरव आणि युवकांना इतिहासातून प्रेरणा देण्याच्या उद्देशाने ब्राह्मण सभा, कोपरगावच्या वतीने आयोजित ‘गुणगौरव, ब्रह्मजीवन गौरव, ब्रह्मगौरव व शिक्षक सन्मान सोहळा-२०२६’ उत्साहात पार पडला. माजी नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्यलक्ष्मी सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषद सदस्य तथा आमदार मा. श्री. विवेकभैय्या कोल्हे, नगराध्यक्ष मा. श्री. पराग संधान, माजी नगराध्यक्ष मा. श्री. संजय सातभाई, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री. प्रसाद नाईक, जेष्ठ विधिज्ञ जयंतराव जोशी, नासिक येथिल अँड. समीर जोशी, श्री. प्रविण कुलकर्णी,ब्राह्मण एकता मंचचे वैभव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्मण सभा अध्यक्ष श्री. मकरंद को-हाळकर यांनी केले. त्यांनी ब्राह्मण सभेच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचा आढावा घेत समाजातील गुणवंतांचा गौरव करणे ही समाजाच्या पुढील पिढीला प्रेरणा देणारी बाब असल्याचे सांगितले.
गुणवंतांच्या कर्तृत्वातून समाजाची प्रगती : विवेकभैय्या कोल्हे
आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी आपल्या मनोगतात गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान ही केवळ कौतुकाची बाब नसून त्यांच्या कार्याची दखल घेऊन इतरांना प्रेरणा देणारा उपक्रम असल्याचे सांगितले. समाजाने शिक्षण, संस्कार आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देत एकजुटीने पुढे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठांच्या अनुभवाचा वारसा नव्या पिढीने पुढे न्यावा : प्रसाद नाईक
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक
श्री. प्रसाद नाईक यांनी ज्येष्ठांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव करणे ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. ज्येष्ठांच्या अनुभवातून आणि गुणवंतांच्या कर्तृत्वातून नव्या पिढीने प्रेरणा घेऊन समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्रीमंत पेशवे बाजीरावांच्या जीवनातून युवकांना प्रेरणा
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते नाशिक येथील व्याख्यात्या सौ. स्नेहल सारंग यांच्या ‘अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे’ या विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्यानाचे. बाजीराव पेशव्यांचे शौर्य, नेतृत्व, दूरदृष्टी, संघर्ष आणि राष्ट्रकार्य यांचा जीवनपट त्यांनी प्रभावीपणे मांडला. त्यांच्या ओजस्वी विवेचनातून उपस्थितांना, विशेषतः युवकांना इतिहासातून प्रेरणा घेण्याचा संदेश मिळाला.
विनायकराव रसाळ यांचा ब्रह्मजीवन गौरव
ब्राह्मण सभेच्या स्थापनेपासून संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे संस्थापक सचिव श्री. विनायकराव रसाळ यांचा ब्रह्मजीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ब्रह्मगौरव पुरस्काराने, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्काराने आणि शिक्षकांचा शिक्षक सन्मानाने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश बडवे यांनी केले, तर उपाध्यक्ष बी. डी. कुलकर्णी यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण सभा, कोपरगावचे अध्यक्ष श्री. मकरंद को-हाळकर,उपाध्यक्ष बाळकृष्ण कुलकर्णी, सचिव सचिन महाजन, सहसचिव संदीप देशपांडे, संघटक महेंद्र कुलकर्णी, गौरीष लव्हरीकर, खजिनदार जयेश बडवे, सहखजिनदार योगेश कुलकर्णी तसेच कार्यकारिणी सदस्य सौ. ऐश्वर्यलक्ष्मी सातभाई, श्री. प्रसाद नाईक, मिलिंद धारणगांवकर, वसंतराव ठोंबरे, सदाशिव धारणगांवकर, संजीव देशपांडे, अजिंक्य पदे, अनिल कुलकर्णी, अँड. श्रद्धा जवाद, सौ. वंदना चिकटे यांनी विशेष परिश्रम घेतले.ब्राह्मण सभेच्या वतीने आयोजित या सोहळ्यात गुणवंतांचा गौरव, ज्येष्ठांच्या कार्याचा सन्मान आणि इतिहासातून नव्या पिढीला प्रेरणा देणारे विचार यांचा सुंदर संगम घडून आला. त्यामुळे हा सोहळा समाजासाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.


