Thursday, July 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोपरगावच्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विद्युतीकरण कामांच्या नूतनीकरणाचा डीपीआर मंजूर करण्याची...

कोपरगावच्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विद्युतीकरण कामांच्या नूतनीकरणाचा डीपीआर मंजूर करण्याची आ. विवेकभैय्या कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!!

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कोपरगाव शहर व ग्रामीण भागामधील वीजेच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विद्युतीकरण कामांच्या नूतनीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आ.विवेकभैय्या कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यवाही करण्याचे आदेश देत प्रतिसाद दिला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका व शहर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वीजेची गंभीर समस्या प्रलंबित आहे. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, वेगाने होत असलेले शहरीकरण आणि शेतीचा विस्तार यामुळे या भागातील विद्यमान वीज यंत्रणा अपुरी पडत आहे. परिणामी नागरिक आणि शेतकरी वारंवार वीजपुरवठा खंडित होणे तसेच कमी दाबाच्या वीजेचा सामना करत आहेत. या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील विद्युतीकरणाच्या कामांना तातडीने मंजुरी देऊन ती पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आ.विवेकभैय्या कोल्हे यांनी नमूद केले आहे.
त्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील वीज वहन क्षमता वाढविण्यासाठी उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचे नूतनीकरण करण्यात यावे, वीजेचा दाब नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक क्षमतेचे नवीन रोहित्र बसविण्यात यावेत, सध्या कार्यरत असलेल्या कमी क्षमतेच्या रोहित्रांचे तातडीने क्षमतेनुसार उन्नतीकरण करण्यात यावे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आणि तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी शहरातील मुख्य वीजवाहिन्या भूमिगत करण्यात याव्यात, अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत.या सर्व कामांसाठी नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक आयोजित करण्यात यावी, अशीही मागणी आ.विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे.
या बैठकीतून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कोपरगावच्या विद्युतीकरणाची कामे मार्गी लागतील.तसेच गावागावांतील सर्वसामान्य वीज ग्राहक, व्यापारी, उद्योग तसेच अन्नदाता शेतकरी बांधवांना सुरक्षित, शाश्वत आणि उच्च दाबाचा दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होण्यास मोठी मदत होईल.लोकहिताच्या या महत्त्वाच्या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांना तातडीने आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती आमदार विवेक भैय्या कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!