Tuesday, July 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिशा समितीच्या बैठकीत आ. विवेक कोल्हे यांनी मांडले कोपरगावच्या विकासाचे महत्त्वाचे प्रश्न!!

दिशा समितीच्या बैठकीत आ. विवेक कोल्हे यांनी मांडले कोपरगावच्या विकासाचे महत्त्वाचे प्रश्न!!

कोपरगाव प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर आमदार विवेक कोल्हे यांनी प्रभावीपणे लक्ष वेधत ठोस मागण्या मांडल्या. समितीचे अध्यक्ष खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सहअध्यक्ष खासदार निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व दिशा समितीचे सदस्य उपस्थित होते.बैठकीत आ. विवेक कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांना प्राधान्य देत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
महावितरणच्या समस्यांवर चर्चा करताना तालुक्यातील सर्व घरगुती वीज जोडण्या गावठाण फीडरवर जोडण्यासाठी आवश्यक सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) एका महिन्याच्या आत तयार करण्यात येईल, अशी ग्वाही महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिली.
जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांमधील अडथळे तातडीने दूर करून प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. तसेच केंद्र शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कांदा चाळ, शेततळे अस्तरीकरण, यांत्रिकीकरण आदी योजनांतील लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याची मागणी आ. कोल्हे यांनी केली.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज प्रस्तावांना बँकांकडून होणारा विलंब गंभीर असल्याचे निदर्शनास आणून देत, पात्र युवक व नवउद्योजकांना वेळेत कर्ज मंजूर करण्यासाठी संबंधित बँकांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) टप्पा-४ अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील पात्र रस्त्यांचा समावेश करून ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम करण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास कार्यक्रमात कोपरगाव तालुक्याचा समावेश करण्याचीही मागणी आ. कोल्हे यांनी केली. भूजल पातळी वाढविणे, जलसंधारणाला चालना देणे, शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध करणे आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा प्रभाव कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.कोपरगावच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मतदारसंघातील नागरिक आणि शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आ. विवेक कोल्हे यांनी यावेळी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!