
कोपरगाव प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना रुजविणाऱ्या ‘हरितोदय’ या विशेष उपक्रमाचे आयोजन श्री चैतन्य टेक्नो स्कूल, पॉवर्ड बाय रेनबो इंटरनॅशनल स्कूल, कोपरगाव येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणारा हा कार्यक्रम सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी कोपरगावचे तहसीलदार मा. महेश सावंत साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेच्या प्राचार्या विद्या विश्वनाथन, डीन सागर पाटील, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत व सत्कारानंतर प्रास्ताविकातून पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक गीत सादर करून तसेच प्रभावी नाटिकेच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि निसर्गरक्षणाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.
प्रमुख अतिथी मा. महेश सावंत साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विद्यार्थी हेच परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा होणारा ऱ्हास याबाबत आपल्या कुटुंबात व समाजात जनजागृती करावी, असेही त्यांनी नमूद केले.
त्यांचे अभ्यासपूर्ण प्रेरणादायी आणि वास्तववादी विचार उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालकांना पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय योगदान देण्याचे प्रेरणा देणारे ठरले.
प्राचार्या विद्या विश्वनाथन यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचे आवाहन करत शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध हरित उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या समारोपावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कृतीतून पर्यावरण संरक्षणाचा प्रत्यक्ष संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नियती पटेल व मनस्वी सरोदे तर आभार प्रदर्शन ॲशर वसावे या विद्यार्थिनींनी केले.
‘हरितोदय’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, निसर्ग संवर्धनासाठी सक्रिय योगदान देण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.


