Tuesday, July 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedआ. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यापुढे बहुराष्ट्रीय कंपनी झुकली;नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाई!!

आ. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यापुढे बहुराष्ट्रीय कंपनी झुकली;नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली नुकसान भरपाई!!

कोपरगाव प्रतिनिधी

नामांकित बहुराष्ट्रीय (मल्टी नॅशनल) बियाणे उत्पादक कंपनीकडून फसवणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे ही दुर्मीळ बाब मानली जाते. मात्र कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकरी याबाबत काहीसे सुदैवी ठरले असून आमदार आशुतोष काळे यांच्या निर्णायक भूमिकेमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सिजेंटा कंपनीकडून तब्बल ६ लाख २६ हजार ४०० रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, चालू हंगामात कोपरगाव मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांनी विविध नर्सरीमधून सिजेंटा कंपनीच्या ‘सिंबा’ वाणाची टरबूज रोपे खरेदी करून लागवड केली होती. मात्र या वाणाची रोपे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच या वाणाला रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि अनेक एकरांवरील टरबूज पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने २५ मार्च रोजी प्रत्यक्ष शेतात पाहणी करून अहवाल सादर केला. या अहवालात सिजेंटा कंपनीच्या ‘सिंबा’ वाणामुळे संबंधित शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. तसेच कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचाही उल्लेख करण्यात आला होता.शेतकऱ्यांवरील अन्यायाची दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री ना.दत्तात्रय भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. निकृष्ट दर्जाची रोपे पुरवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करून नुकसानग्रस्तांना न्याय मिळावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच कृषी विभागाने सातत्याने पाठपुरावा करण्याच्या व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत प्रयत्न सुरू ठेवण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकारी अधिकाऱ्यांना दिल्या.
आमदार आशुतोष काळेंचा रेटा व कृषी विभागाच्या पाठपुराव्याच्या एकत्रित प्रयत्नातून अखेर सिजेंटा कंपनीने माघार घेत ७.२० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण ६ लाख २६ हजार ४०० रुपयांची नुकसानभरपाई अदा केली. याबाबतची माहिती तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी नुकत्याच झालेल्या कृषी विभागाच्या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांना दिली. बहुराष्ट्रीय बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घटना अत्यंत दुर्मीळ असून, अशा प्रकारचा निर्णय प्रथमच झाल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या कारवाईमुळे कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात कोणतीही कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल, अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.कृषी विभागाच्या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांच्याशी चर्चा करतांना तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!