
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचे जात प्रमाणपत्र समाज कल्याण विभागाच्या जात पडताळणी अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले यात दोष दुसऱ्या कुणाचा नसून तुमच्या नेत्याचा आहे.आमदार आशुतोष काळे सर्व जाती-धर्माला सोबत घेवून चालणारे नेतृत्व आहे. तुमचा घात तुमच्या नेत्यानेच केला त्यांनाच जाब विचारा असा सल्ला खोटे जातप्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे वैफल्यग्रस्त होवून पत्रकार परिषदेत बिनबुडाचे आरोप करणाऱ्या उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते विजय त्रिभुवन यांनी दिला आहे.
उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी केलेल्या आरोपांचा शुक्रवार (दि.०३) रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विजय त्रिभुवन यांनी चांगलाच समाचार घेतला यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की,तुमचे जात प्रमाणपत्र अवैध ठरणार आहे हे तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना माहिती होते. तरी देखील त्यांनी तुम्हाला निवडणूक लढवायला सांगितली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानापुढे सगळे सारखे असून तुमच्या जात प्रमाणपत्रात त्रुटी आढळल्याने निकाल तुमच्या विरोधात जाऊन जात पडताळणी अधिकाऱ्यांनी तुमचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले आहे.त्यामुळे तुमचा घात तुमच्याच नेत्यानेच केला असतांना तुम्ही तुमच्या नेत्यांना जाब विचारायचे सोडून आ.आशुतोष काळे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहे हे आम्ही खपवून घेणार नाही.नगरपालिका निवडणूक होऊन ६ महिने झाले. तुम्ही अनेक पत्रकार परिषद घेतल्या तेव्हा तुम्ही कधी गळ्यात निळा गमछा घातला नाही. काल मात्र निळा गमछा घालून समाजावर फार मोठा अन्याय झाला असा टाहो फोडता. पण एक लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे समाज नाही.२०१९ च्या निवडणुकीत समाजाने दाखवूनन दिले आहे कि, समाज एकमताने आ.आशुतोष काळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही ज्यांच्यावर आरोप करतात त्यांचे तुम्ही काल पर्यंत कार्यकर्ते होता हे विसरू नका. काळे कुटुंबीयांनी तुम्हाला आणि तुमच्या घरात उमेदवारी दिल्या आहे. तुमच्या नेत्यांनी आज पर्यंत समाजात गैरसमज पसरवण्याचे काम केले आणि आज तेच काम तुम्ही करीत आहात.त्यामुळे तुमच्या नेत्यांनी दिलेली स्क्रीट बोलू नका.
तुम्ही ज्यांच्या सोबत काम करतात, त्यांनी ४० वर्ष सत्ता भोगली. माझा त्यांना प्रश्न आहे, त्यांनी आंबेडकरी समाजाला काय दिले. आ.आशुतोष काळे यांनी पहिल्याच टर्म मध्ये प्रत्येक समाजाला बोलावून समाज मंदिरांसाठी निधी दिला. उक्कडगाव बुद्ध विहार, लुम्बिनी बुद्ध विहार, धम्म दीप, अशा अनेक बुद्ध विहारांना त्यांनी भरघोस निधी दिला. तसेच खडकीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाला निधी दिला. तरीही तुम्ही म्हणता की, आ.आशुतोष काळे आंबेडकरी समाजाला मागे खेचतात? हि हास्यास्पद बाब असून तुमच्या बुद्धीची कीव येते.समाज सर्व जाणतो, तुम्ही लोकशाही पद्धतीने लढा. उगाच बिनबुडाचे आरोप करू नका.
मा.खा.स्व. कर्मवीर शंकररावजी काळे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यातील पहिले स्मारक कोळपेवाडी कारखाना परिसरात उभारले. ते जर समाज विरोधी असते तर त्यांनी आंबेडकरांचे स्मारक का बांधले असते? असा सवाल विचारत, समाजाला यामध्ये आणू नका समाज हे कधी स्वीकारणार नाही.तुम्ही लोकशाही पद्धतीने लढा. उगाच आरोप करू नका. माजी आ.अशोकराव काळे यांनी कोपरगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे स्मारक उभारले. आ. आशुतोष काळे यांनी स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी १ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. हे स्मारक राज्यात एक नंबरचे व्हावे हा आ.आशुतोष काळे यांचा प्रयत्न आहे.अशा सर्व समाजाला सोबत घेवून चालणाऱ्या व आंबेडकरी चळवळ जपणाऱ्या नेत्यावर आरोप केल्यास आम्ही कदापि सहन करणार नाही असा ईशारा विजय त्रिभुवन यांनी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांना दिला आहे.
आम्ही लोकशाही मार्गाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोक्यात घेवून चालणारे आहोत.तुम्ही लोकशाहीत आहात. तुमच्या नेत्याचे गुण तुमच्यात उतरले असले तरी दमबाजी, अरेरावीची भाषा करू नका. आम्ही पण भीम सैनिक आहोत आम्हाला पण भीम टोल्याची भाषा येते. -विजय त्रिभुवन.


