
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव नगरपरिषदेच्या वर्षानुवर्षापासून बंद पडलेल्या स्विमिंग पूलच्या नगरपरिषदेच्या मालकीच्या खोलीत गावठी कट्टा सापडतो याचा अर्थ सरळ असून कोपरगाव शहरात गुन्हेगारी वाढविणे हीच कोल्हेंच्या विकासाची खरी पावती असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक वाल्मिक लाहीरे यांनी सत्ताधारी कोल्हे गटावर केली आहे.
शुक्रवार (दि.३) रोजी कोपरगाव नगरपरिषदेच्या इनडोअर गेम हॉल परीसरातील स्विमिंग पूल लगत असलेल्या एका बंद खोलीत जी खोली कोपरगाव नगरपरिषदेच्या मालकीची आहे त्या खोलीत गावठी कट्टा आढळून आल्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर घटनेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक वाल्मिक लाहीरे यांनी सत्ताधारी कोल्हे गटाला चांगलेच सुनावले आहे. यापूर्वीही कोल्हेंचे व्हिजन युवा वर्गाला अवैध धंदे करायला लावायचे आणि ज्या इमारतीत कोणी जाणार नाही अशा ईमारती उभ्या करायच्या असेच होते. बारा तेरा वर्षापूर्वी कोल्हेंकडे नगरपरिषदेची सत्ता असतांना त्यांच्या तात्कालीन नगराध्यक्षांनी सरकारचा पैसा वाया घालवून अशा ठिकाणी स्विमिंग पूल बांधला त्या ठिकाणी कोणी जात नाही. तो स्विमिंग पूल आज अखेरच्या घटका मोजीत असून आज तो स्विमिंग पूल गुन्हेगारांचे आश्रयस्थान झाला आहे. हेच व्हिजन कोल्हेंनी कोपरगावला दिले आहे. त्या बंद पडलेल्या स्विमिंग पूलच्या खोलीत दिवसाढवळ्या गावठी कट्टा सापडला असून कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता मिळाल्यानंतर कोल्हेंकडून त्याची पुनरावृत्ती होत आहे.याचाच अर्थ सत्ताधारी गटाकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कोपरगाव शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला खतपाणी घातले जात असून त्यामुळे कोपरगाव शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावत चालली आहे.
कोपरगाव शहरात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून नगरपरिषदेच्या मालकीच्या खोलीत सापडलेल्या कट्ट्यावरून या वाढत्या गुन्हेगारीमागे कोण आहे? याचे उत्तर कोपरगावकरांना मिळालेले आहे.कोपरगावकरांवर वाढीव घरपट्टी आकारून अगोदरच त्यांची आर्थिक कोंडी करून टाकली असतांना दिवसा गावठी कट्टे सापडायला लागले तर गुन्हेगारीच्या बाबतीत कोपरगाव इतर गुन्हेगारी शहराला लवकरच मागे टाकेल हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज पडणार नाही. एकूणच सत्ताधाऱ्यांचा गुन्हेगारी वाढविण्याला मिळत असलेला छुपा पाठिंबा हीच कोल्हेंच्या विकासाची खरी पावती आणि हाच कोल्हेंचा अजेंडा असल्याचे नगरसेवक वाल्मिक लाहीरे यांनी म्हटले आहे.


