
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग संगमनेरच्या कोपरगाव व राहाता अंतर्गत मंजूर असलेल्या जलजीवन पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन कामे कार्यान्वित करावीत, अशी मागणी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जलजीवन मिशन ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळजोडणीद्वारे सुरक्षित व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये जलजीवन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग संगमनेरच्या कोपरगाव अंतर्गत वारी-कान्हेगाव, कुंभारी, कोळपेवाडी, मळेगावथडी, मायगाव देवी, सुरेगाव, रवंदे, चासनळी, धारणगाव (पाच गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना) तसेच रांजणगाव देशमुख (सात गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना) या गावांतील योजना समाविष्ट आहेत. तसेच राहाता अंतर्गत पुणतांबा व पिंपळवाडी-नपावाडी (प्रादेशिक पाणीपुरवठा योजना) या जलजीवन पाणीपुरवठा योजनांचाही समावेश आहे.
मात्र, निधीअभावी या योजनांची कामे अनेक ठिकाणी अत्यंत संथ गतीने सुरू असून काही ठिकाणी पूर्णपणे ठप्प झाली आहेत. त्यामुळे संबंधित गावांतील नागरिकांना योजनेचा अपेक्षित लाभ मिळण्यास विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गावांतील सरपंच व ग्रामस्थांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे केली होती.
आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची विधानभवनात भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले.यावेळी मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सदर निवेदनाची तात्काळ दखल घेत कोपरगाव व राहाता अंतर्गत जलजीवन पाणीपुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांसाठी आवश्यक निधी पुढील १५ दिवसांत उपलब्ध करून दिला जाईल. तसेच संबंधित कामे गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल,असे आश्वासन आमदार विवेकभैय्या कोल्हे यांना दिले.


