
कोपरगाव प्रतिनिधी
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त मा. बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाऊच वसाहत व उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देणारा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
खेड्यापाड्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहावे, त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी आणि शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यावाटपाचा उपक्रम आयोजित केला जातो. शिक्षणाबाबत विशेष आस्था असलेले माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांचा हा विचार आणि प्रेरणा आजही समाजोपयोगी कार्यातून जपली जात असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शाळा डाऊच वसाहत येथे झालेल्या कार्यक्रमास श्री. गंगाधर गुरसळ, श्री. भास्करराव गुरसळ, श्री. गौरव गुरसळ, श्री. गणेश गुरसळ, श्री. आप्पासाहेब गुरसळ यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. भरत गायकवाड यांनी केले. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व विशद केले. तर उर्दू शाळेचे शिक्षक श्री. नईम मणियार यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, शिक्षणाप्रती असलेली तळमळ आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीची कटिबद्धता अधोरेखित झाली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करून शिक्षणाचा दीप अधिक प्रज्वलित करण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात आले.


