

कोपरगाव प्रतिनिधी
मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेतून बारमाही, मजबूत रस्त्यांचे बांधकाम करून पेरणी, मशागत,कापणी आणि शेतमाल वाहतुकीस गती देण्यासाठी कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या अडचणी सोडविण्यासाठी निधी मिळावा यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी महायुती शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघातील ७.५ कोटी निधीच्या शेत पाणंद रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.ग्रामीण भागातील नागरीकांना शेत,पाणंद रस्त्यांची वाढती गरज लक्षात घेवून व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून महायुती शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेतून जास्तीत जास्त लोकवस्ती असलेल्या रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला मिळालेल्या यशामुळे मतदार संघाच्या अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेत-पाणंद रस्त्यांच्या अडचणी कायमच्या दूर होणार आहेत.पावसाळ्यात चिखल व साचलेल्या पाण्यामुळे रस्ते बंद राहतात त्यामुळे बैलगाडी, ट्रॅक्टर देखील शेतात जावू शकत नाही. पेरणी आणि कापणीच्या वेळी जर अशी परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच वाढतात. याची दखल घेवून महायुती शासनाने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना सुरु केली आहे. पाणंद रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतात सुलभपणे ये-जा करता येणार आहे. तसेच पेरणी आणि काढणीच्या हंगामात शेती मालाची वाहतूक अडचण कमी होवून शेतमाल बाजारात पोहचवण्यासाठीचा खर्च निश्चितपणे कमी होणार असून तातडीने बाजारपेठेशी संपर्क होण्यास मोठी मदत होणार आहे. चिखल,पावसाळा किंवा खराब रस्त्यांच्या समस्यांपासून शेतकऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीव्यवस्थेला मोठा आधार मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. महायुती शासनाने कोपरगाव मतदार संघातील ७.५ कोटी निधीच्या शेत पाणंद रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. श्रीम.सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, महसूल मंत्री ना.चंद्रशेखरजी बावनकुळे, पालकमंत्री ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांचे आभार मानले आहे.


