
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवारच्या वीज खंडित प्रकारामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रचंड उकाड्यात रात्री पाच ते सहा तास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने महावितरण विभागाला कठोर शब्दांत निवेदन सादर करण्यात आले आहे.
दरम्यान, महावितरण अधिकारी दिनेश पंढोरे यांना जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने
महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते,
किसन काँग्रेस उपअध्यक्ष विजय सुधाकर जाधव, काँग्रेस प्रदेश सचिव नितीन शिंदे, गौतम बँकेचे संचालक बापुराव वक्ते, माजी सरपंच राजेंद्र गिरमे, पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड,
उपसरपंच जालिंदर चव्हाण,
सोशल मिडीयम तालुका अध्यक्ष महेंद्र वक्ते, कल्याणराव गुरसळ,
शरदचंद्र पतसंस्थेचे संचालक विरेंद्र शिंदे, सरपंच यशवंतराव आव्हाड, भाजप युवामोर्च तालुका सचिव किशोर गायकवाड,
रघुनाथ वक्ते, कोंडीराम वक्ते, दादासाहेब चव्हाण,
अभिजीत गुरसळ ,पोपटराव शिंदे अमोल दौंड, शशिकांत गुरसळ उद्योजक संदीप वक्ते,रामभाऊ वक्ते, कैलास चव्हाण,लक्ष्मण वक्ते, ग्रामपंचायत सदस्य किशोर वक्ते, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड, पोपट सोळके, बाळासाहेब देवकर,
अजिक्य चव्हाण, मधुकर वक्ते, संदीप राऊत, मनोज जगताप,
यांनी निवेदन देऊन तात्काळ रात्रीचे लोडशेडिंग बंद करण्याची मागणी केली.
गावात रात्रीच्या वेळी अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने लहान मुले, वृद्ध, महिला तसेच आजारी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उष्णतेमुळे नागरिकांची झोप उडाली असून अनेकांना विविध आरोग्य समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. “रात्रभर अंधार, उकाडा आणि डासांच्या वाढत्या त्रासामुळे जगणे असह्य झाले आहे,” अशी तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता लोडशेडिंग करण्यात येत असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या वीज खंडित प्रकाराचा फटका शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून ग्रामीण भागातील दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
त्यातच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यासही नागरिक धजावत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अंधारामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
विशेष म्हणजे गावातील अनेक वृद्ध व्यक्तींना दमा व श्वसनाचे आजार असल्याने उकाडा आणि वीज नसल्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावत आहे. रात्रभर पंखे बंद राहत असल्याने वृद्ध नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून काहींना रात्र जागून काढावी लागत आहे. औषधोपचारासाठी लागणारी उपकरणे तसेच घरगुती सुविधा बंद पडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. “वीज नसल्याने वृद्ध आणि आजारी नागरिकांचे हाल होत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत जेऊर कुंभारी ग्रामस्थांनी महावितरणच्या कोपरगाव विभागाला तात्काळ रात्रीचे लोडशेडिंग बंद करून सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. “ग्रामस्थांच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारले जाईल,” असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
वीज प्रश्नावर आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला असून, महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.


