Wednesday, May 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोदावरी उजव्या कालव्याचे आवर्तन सुटूनही हरिसन ब्रँचचारी कोरडीच शेतकरी, जनावरे आणि शेती...

गोदावरी उजव्या कालव्याचे आवर्तन सुटूनही हरिसन ब्रँचचारी कोरडीच शेतकरी, जनावरे आणि शेती संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संतापाची लाट तातडीने पाणी न सोडल्यास तीव्र जनआंदोलन छेडणार !!- सरपंच यशवंतराव आव्हाड

जेऊर कुंभारी | वार्ताहर

गोदावरी उजव्या कालव्यातून आवर्तन सुटून तब्बल पंधरा दिवस उलटून गेले तरी हरिसन ब्रँचचारी परिसरातील शेतकऱ्यांना अद्याप पाणी मिळाले नसल्याने संपूर्ण पंचक्रोशीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाटबंधारे विभागाच्या निष्काळजी व ढिसाळ नियोजनामुळे शेती, जनावरे आणि ग्रामीण जनजीवन गंभीर संकटात सापडले असून प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे.
नेहमीच्या नियमानुसार चितळी परिसरात पाणी पोहोचल्यानंतर दोन ते तीन दिवसांत हरिसन ब्रँचचारीला पाणी दिले जाते. मात्र यंदा आवर्तन सुटून पंधरा दिवस उलटूनही हरिसन ब्रँच परिसर कोरडाच असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये भीती आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः जेऊर कुंभारी, कोकमठाण, पानमळा, चांदेकसारे आणि डाऊच खुर्द परिसरातील शेतकरी पूर्णपणे या आवर्तनावर अवलंबून असल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
उन्हाचा तीव्र तडाखा वाढत असताना अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून हिरव्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने खरीपपूर्व मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेली पूर्वतयारी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असून आगामी हंगाम धोक्यात आल्याची भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, पाटबंधारे विभागाकडून हरिसन ब्रँच परिसराकडे सातत्याने दुजाभाव केला जात आहे. प्रत्येक आवर्तनावेळी पाण्यासाठी शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.
दरम्यान, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास मोठ्या प्रमाणात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा सरपंच यशवंतराव आव्हाड
यांनी दिला आहे. आपल्या प्रसिद्ध पत्रकात त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका करताना म्हटले आहे की, “शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला असताना पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर प्रशासनाने दुर्लक्ष करणे अत्यंत संतापजनक आहे. वेळेवर आवर्तन न मिळाल्यास पिकांचे मोठे नुकसान होईल आणि शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होतील. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हरिसन ब्रँचचारीला पाणी सोडावे; अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.”
ग्रामीण भागातील हजारो शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांचे जीवन पाण्यावर अवलंबून असताना पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे संपूर्ण परिसर संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हरिसन ब्रँच परिसराला त्वरित पाणीपुरवठा करावा, अन्यथा परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!