

कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव मतदारसंघातील मुंबई-नागपूर मार्गावरील संवत्सर येथील जुन्या पुलासह रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असून याचा जड वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे. संबंधित रस्ता बंद असल्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून पुणतांबा फाटा मार्गे वाहतूक सुरू आहे. त्यामुळे नगर मनमाड महामार्ग शिर्डी कोपरगाव मार्गावरील पुणतांबा फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून या कोंडीचा त्रास सर्वसामान्य वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याचे व संवत्सर येथील पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मागील अनेक महिन्यांपासून मुंबई-नागपूर मार्गावरील संवत्सर येथील पुलाचे व रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. सध्याच्या स्थितीत संवत्सर येथील पूल पूर्णपणे बंद असून रस्ताही अनेक ठिकाणी खोदण्यात आलेला आहे. त्यामुळे जड वाहतूक पुणतांबा फाट्यावरूनच सुरू आहे. या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी होत असून वाहनधारकांना विविध अडचणी उद्भवत आहेत.अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
पुणतांबा फाट्यावर एकाच मार्गावर जड वाहतूक तसेच प्रवासी वाहने मोठ्या प्रमाणात येत असल्याने पुणतांबा फाट्यावरील चौफुलीत दररोज मोठ्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रस्त्याचे व संवत्सर येथील पुलाचे काम वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक व वाहनधारकांची मोठी तारांबळ उडत आहे.अनेक नवीन वाहनधारक पुलापर्यंत येऊन पुन्हा माघारी फिरत असून ते परत पुणतांबा फाट्यावर येतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होत आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना व वाहनधारकांना दिवसातून अनेकदा तासन्तास त्या ठिकाणी थांबून अडचणींचा सामना करावा लागत आहे.तसेच या वाहतूक कोंडीमुळे अपघात होण्याच्या घटनाही वारंवार घडत असून प्रशासनाने या वाहतुकीचा बंदोबस्त करण्यासाठी संवत्सर मार्गावरील रस्त्यासोबत पुलाचेही प्रलंबित काम वेळेत पूर्ण करणे अनिवार्य झाले आहे.
पूर्वीपासून संवत्सर मार्गावरून जड वाहतूक वळवून दिलेली होती. मात्र सध्याच्या स्थितीत मागील अनेक महिन्यांपासून या ठिकाणी काम सुरू असल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून जड वाहतूक पुणतांबा फाट्यावरून वळवण्यात आली आहे. संबंधित मार्गावरून प्रवासी वाहने तसेच जड वाहतूक एकत्र येत असल्यामुळे त्या ठिकाणी दररोज मोठी ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होत आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.मुंबई-नागपूर मार्गावरील संवत्सर येथील पुलासोबत रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे असून सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे मत मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.


