
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव व राहता तालुक्यात मागील वर्षीच्या खरीप हंगाम २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली पिके भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत उत्पादन आधारित नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली असून ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती आ. विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली आहे त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्ता भरणे व शासनाचे आभार मानले आहेत.
गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला होता. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काढणीच्या उंबरठ्यावर असलेली सोयाबीन, बाजरी, कापूस, तूर, तसेच चारा पिके यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरले होते. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले होते.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी सातत्याने महायुती शासनाकडे पाठपुरावा केला होता. शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी कोल्हे यांनी संबंधित यंत्रणांशी सातत्याने संवाद साधत पाठपुरावा कायम ठेवला.या प्रयत्नांना यश मिळत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
या आर्थिक सहाय्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आगामी हंगामासाठी भांडवल उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता कमी होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत आ. विवेकभैय्या कोल्हे यांचे आभार मानले आहेत तसेच प्रलंबित मंडलातील देखील मदत लवकर मिळावी अशी मागणी केली आहे.


