
कोपरगाव प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती कोकमठाण येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये कोकमठाण ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि आंबेडकर नगर अशा विविध ठिकाणी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम आणि गौतम सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन विजयराव रक्ताटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. यावेळी संचालक सुधाकर रोहम यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळे लोकशाही अधिक सक्षम झाली. त्यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करून समाजात समता व बंधुता निर्माण करणे आजची खरी गरज आहे. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतांना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले.
यावेळी सिद्धार्थ सेवा संघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवून जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ सेवा संघाचे पदाधिकारी, कोकमठाण ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


