Sunday, March 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedनगरपालिका सत्ताधाऱ्यांचा कारभार बोलाचीच कढी अन बोलाचाच भात!!-मा.नगरसेवक मंदार पहाडे

नगरपालिका सत्ताधाऱ्यांचा कारभार बोलाचीच कढी अन बोलाचाच भात!!-मा.नगरसेवक मंदार पहाडे

स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या घोषणा विरल्या हवेत, नागरिकांना मिळतय गाळमिश्रित पाणी!!

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांकडून शहराला स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे मोठमोठे दावे करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कोपरगावकरांच्या नशिबी दूषित आणि गाळमिश्रित पाणीच असल्याचे कोपरगावकरांना होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यावरून दिसून येत आहे. शहरातील मुख्य भागांमध्ये अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या काळात नागरिकांना मोठमोठे आश्वासने दिली मात्र वास्तवात ही आश्वासने खरी ठरली नाही. त्यामुळे नगरपालिका सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे बोलाचीच कढी अन बोलाचाच भात असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटावर केली आहे.कोपरगाव शहरातील गोदाम गल्ली, गोखरु बाबा गल्ली, बँक रोड आणि गिरमे चाळ या परिसरासह शहरातील अनेक ठिकाणी गाळ मिश्रित आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. हे पाणी पिण्यायोग्य तर सोडाच साध्या वापरासाठीही हे पाणी योग्य नाही. सत्ताधारी पक्ष शहरात स्वच्छ पाणी देत असल्याचा टेंभा मिरवत असताना, प्रत्यक्षात नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ मांडला जात असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. नगरपरिषदेतील सत्ताधारी नेमके कोणत्या भागात स्वच्छ पाणी देत आहेत हा तर संशोधनाचा विषय ठरावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या केवळ घोषणा करणाऱ्या या सत्ताधाऱ्यांचे काम म्हणजे बोलाचीच कढी अन बोलाचाच भात यापलीकडे काहीही नाही. त्यांच्या हलगर्जीपणाचा आणि नियोजनशून्य कारभाराचा फटका आज सर्वसामान्य कोपरगावकरांना बसत आहे. अशा दूषित पाण्यामुळे शहरात अनेक आजारांची साथ शहरात पसरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या आत्ममग्न कारभारामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.त्यामुळे जोपर्यंत पाणीपुरवठ्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत नागरिकांनी पाणी वापरण्यापूर्वी ते पाणी गाळून आणि शक्य तितके शुद्ध करूनच वापरावे असे आवाहन माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी केले आहे. तसेच कोपरगावच्या जनतेच्या हक्कासाठी आणि या बेजबाबदार सत्ताधाऱ्यांना जाग्यावर आणण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!