
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव नगरीत श्रीरामनवमीच्या पावन पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरगाव ते शिर्डी साईगाव पालखी सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. साईनामाच्या गजरात, ‘जय साईराम’ आणि ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. हजारो साईभक्त निःस्वार्थ भावनेने, पायी चालत साईबाबांच्या पवित्र दर्शनासाठी मार्गस्थ झाले होते.
या भक्तिमय वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांसाठी लस्सी व मसाला ताकाचे वाटप करून सेवाभावाची सुंदर परंपरा जपण्यात आली. साई दर्शनाच्या ओढीने पायी चालणाऱ्या भाविकांसाठी हा उपक्रम आनंद देणारा ठरला. या सेवाभावी उपक्रमांमुळे समाजात सद्भावना, सहकार्य आणि श्रद्धेची भावना अधिक दृढ होत असून, साईभक्तांच्या सेवेत सदैव तत्पर राहण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अत्यंत निष्ठेने व समर्पणाने या उपक्रमात सहभाग घेतला. प्रत्येक साईभक्ताला प्रेमाने थंडगार लस्सी व ताक देताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि सेवाभाव स्पष्ट दिसत होता. सेवेतूनच ईश्वरप्राप्ती या तत्त्वाचा प्रत्यय या उपक्रमातून आला. यावेळी सर्व साईभक्तांना आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने श्रीरामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या. भक्ती, सेवा आणि एकात्मतेचा सुंदर संगम या प्रसंगी अनुभवायला मिळाला. “जय श्रीराम” च्या घोषणांनी परिसर अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.


