Sunday, March 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedपोलीस स्टेशनची इमारत केवळ विटा आणि सिमेंटची रचना नसून आपल्या सुरक्षितेची हमी!-...

पोलीस स्टेशनची इमारत केवळ विटा आणि सिमेंटची रचना नसून आपल्या सुरक्षितेची हमी!- आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन इमारत केवळ विटा आणि सिमेंटची रचना नाही तर ती आपल्या सुरक्षितेची हमी आहे. नागरिकांचा विश्वास आहे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचा नवा अध्याय आहे. आपण सर्वांनी मिळून कोपरगावची कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करूयात असे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.
स्व. अजितदादा पवार यांचे प्रशासनावर असलेल्या एकदम मजबूत पकडीतून दर्जेदार काम झालेल्या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन व ६४ पोलीस कर्मचारी वसाहत इमारतीचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. ३ रोजी संध्या. ६ वाजता पोलीस स्टेशन परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी आ. आशुतोष काळे बोलत होते.
पुढे बोलताना आ. आशुतोष काळे यांनी सांगितले कि, कोपरगाव शहर व कोपरगाव तालुका असे एकच पोलीस स्टेशन होते. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर अधिकचा ताण पडत होता. यावर कायमचा तोडगा निघावा म्हणून माजी आ. अशोकराव काळे साहेब यांनी २०१३ साली तत्कालीन गृहमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मार्फत शहर व ग्रामीण असे दोन वेगवेगळी पोलीस स्टेशन तयार केली. दोन्ही पोलीस स्टेशनच्या इमारती आणि पोलीस कर्मचारी वसाहती व्हाव्या यासाठी स्व. अजितदादा पवार कोपरगावाच्या दौऱ्यावर असताना पोलीस स्टेशन व वसाहतीची हलाकीची परिस्थिती दाखवून जनतेची सेवा करणाऱ्या पोलीस बांधवांना नवीन पोलीस स्टेशन आणि राहण्यासाठी नवीन वसाहत इमारतीची मागणी केली. स्व. अजितदादांनी या इमारतीच्या संदर्भात मंत्रालयात बैठक बोलावली आणि लगेच दोन्ही इमारती साठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. या कार्यक्रम प्रसंगी स्व. अजितदादा पवार यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. दादांनी राज्यभर प्रसाकीय कार्यालये उभारून महाराष्ट्राला अधिक मजबूत केले आहे. स्व. अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून कोपरगाव तालुका व ६४ कर्मचारी वसाहत इमारतीने कोपरगाव शहराच्या वैभवात लाख मोलाची भर टाकली आहे.
तालुक्यामध्ये अजूनही कायदा सुव्यवस्थेचा आणि अवैध धंद्यांचा प्रश्न शिल्लक आहे. यावर पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अधिक ताकतीने काम करावे. पोलीस प्रशासनाचे पाठबळ इतर विभागाला मिळाले तर त्यांची काम करण्याची उर्जा निर्माण होते. यामुळे पोलीस प्रशासनाने जबादारीने काम करून तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी. कोपरगाव तालुक्याचे प्रसाकीय कामकाज विना अडथळा चालण्यासाठी कोपरगाव कोर्ट, उप जिल्हा रुग्णालय इमारत व पोलीस स्टेशन व कर्मचारी वसाहत इमारत उभी राहण्यासाठी स्व. अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व एकनाथजी शिंदे साहेब यांचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार्य मिळाले आहे. कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी कायमच पालकमंत्र्यांचे सहकार्य लाभत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले कि, पोलीस स्टेशन व कर्मचारी वसाहत इमारत उभी करण्यासाठी तत्कालीन आ. अशोकराव काळे साहेब आणि सध्याचे आ. आशुतोष काळे यांनी प्रयत्न केले आहे. जिल्ह्यात अनेक अर्थ फसवणुकीचे व्यवहार आणि अमली पदार्थांचे राकेट चालू आहे. यावर तातडीने उपाय योजना करून जिल्हा सुरक्षित आणि शांतता पूर्ण अबाधित ठेवाण्याचा प्रयत्न करा. महायुती सरकारच्या वतीने राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे.
यावेळी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, प्रांताधिकारी माणिक आहेर, माजी आ. स्नेहलताताई कोल्हे, राजेश आबा परजणे, राजेंद्र जाधव, नगराध्यक्ष पराग संधान, नितीन औताडे, काकासाहेब कोयटे, काळे कारखाना व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे, कोल्हे कारखाना चेअरमन ज्ञानेश्वर परजणे, गौतम बँक चेअरमन संजय अगवण, संभाजी काळे, विश्वासराव महाले, अरुण येवले आदीसह पोलीस अधिकारी, पत्रकार बांधव व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!