
कोपरगाव प्रतिनिधी
ग्रामीण भागातील अनेक तरुणांसाठी गरिबी, मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थिती हा स्वप्नांसमोरचा मोठा अडथळा मानला जातो. मात्र सोनेवाडी (ता. कोपरगांव) येथील सुशांत दिगंबर जावळे यांनी आपल्या जिद्दीने आणि चिकाटीने हा समज खोटा ठरवत एक उत्तुंग यशाची उंची गाठली आहे. उच्च पगाराची, स्थिर आणि सुरक्षित अशी संशोधन व विकास विभागातील कॉर्पोरेट नोकरी सोडून, त्यांनी लहानपणापासून जपलेले ध्येय साध्य करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या सेवेत प्रवेश मिळवला आहे. राज्य न्यायवैद्यक प्रयोगशाळा, मुंबई येथे त्यांची सहाय्यक रासायनिक विश्लेषक या पदावर निवड झाली असून, ग्रामीण भागातील तरुणांसाठी हा मार्गदर्शक ठरणारा आदर्श आहे.
शिक्षणाचा संघर्ष आणि कुटुंबाची धडपड
सुशांत यांचे बालपण साध्या आणि मर्यादित साधनांच्या कुटुंबात गेले. वडील दिगंबर जावळे हे मजुरी करत मुलांना शिक्षित करण्यासाठी राबत राहिले. आईने घर सांभाळताना शिक्षणासाठी आवश्यक गोष्टींची कमतरता भासू दिली नाही. आर्थिक अडचणी असल्या तरी सुशांत यांचे शिक्षण कधीच थांबू दिले गेले नाही.
दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी करमवीर शंकरराव काळे विद्यालय, सोनेवाडी येथे पूर्ण केले. त्यानंतर रसायनशास्त्राविषयीची आवड ओळखत त्यांनी पदवी अभ्यासक्रम निवडला. शिक्षणादरम्यान अनेक वेळा वह्या, पुस्तके, फी यासाठी अडचणी आल्या; पण ही अडचण कधीच त्यांच्या पावलांना थांबवू शकली नाही.
पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी संजीवनी संस्थेची निवड केली. या काळात ते अभ्यासात नेहमीच अग्रेसर राहिले. ग्रामीण भागातील एका साध्या विद्यार्थ्याने रसायनशास्त्रासारख्या विषयात उत्तम गुणांसह पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही पदव्या मिळवल्या, ही स्वतःतच कौतुकास्पद बाब आहे.
हैदराबादमधील उज्वल कारकीर्द… पण मनात वेगळेच स्वप्न
उच्च शिक्षणानंतर सुशांत यांना हैदराबाद येथे संशोधन व विकास विभागात उत्तम पगाराची नोकरी मिळाली. सर्वसामान्य तरुणांसाठी ही नोकरीच अंतिम ध्येय ठरते. परंतु सुशांत यांचे मन वेगळ्या मार्गावर होते. लहानपणापासूनच शासन सेवेत काम करण्याचे, समाजकार्यास लाभदायी ठरणाऱ्या क्षेत्रात योगदान देण्याचे त्यांचे स्वप्न होते.
न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये रसायनशास्त्र क्षेत्रातील तज्ञ म्हणून काम करण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनातून कधीच गेली नव्हती. संशयित प्रकरणांमध्ये वैज्ञानिक पद्धतीने पुरावे शोधणे, समाजाला न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत वैज्ञानिकाचा थेट सहभाग — हे काम सुशांत यांना नेहमीच आकर्षित करत होते.उच्च पगाराची नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय
कुटुंबाची जबाबदारी, स्थिर नोकरी, चांगले भविष्य.. या सगळ्यांच्या पुढे नोकरी सोडण्याचा निर्णय सामान्यतः अशक्य मानला जातो. परंतु सुशांत यांनी आपल्या आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी कठोर निर्णय घेतला.
आपल्या मूळ ध्येयाच्या मागे जाण्याची वेळ आली आहे, असे ठरवत त्यांनी हैदराबादमधील नोकरीचा राजीनामा देऊन सोनेवाडीला परतले. या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, टीका केली, शंका घेतली; पण त्यांच्या आई-वडिलांनी आणि बहिणींनी मात्र हा निर्णय मनापासून स्वीकारला आणि त्यांना पुन्हा उभारी दिली. अभ्यासात सातत्य आणि अखेर यशाचा क्षण
घरची परिस्थिती पाहता तयारीसाठी भरपूर साधनसामग्री नव्हती. पण सुशांत यांनी उपलब्ध पुस्तकांवरच अवलंबून राहून, दिवस-रात्र अभ्यास करून स्वतःची क्षमता सिद्ध केली. नोकरी सोडल्यानंतर आलेल्या मानसिक ताणालाही त्यांनी सकारात्मकतेने सामोरे गेले.
भरती प्रकियेमध्ये लेखी परीक्षा अत्यंत कठीण मानली जाते. त्यानंतरची मुलाखतही आव्हानात्मक असते. मात्र सुशांत यांनी दोन्ही टप्प्यांत उत्तम कामगिरी करून यश मिळवले. शेवटी सहाय्यक रासायनिक विश्लेषक या महत्त्वाच्या पदावर त्यांची निवड जाहीर झाल्याने सोनेवाडी गावातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुटुंबाचा आधार….यशामागची खरी शक्ती
त्यांच्या यशाबद्दल बोलताना सुशांत भावूक होत म्हणाले, “मी खचत असताना माझ्या वडिलांनी कधीही मला निराश होऊ दिले नाही. आईने प्रत्येकवेळी माझ्यावर विश्वास दाखवला. लोकांनी काहीही बोलले, तरी माझ्या कुटुंबाने मला पाठीशी घातले. हे यश म्हणजे त्यांचेच आहे.”
अत्यंत प्रतिकूल स्थितीतून उभे राहून शिक्षण पूर्ण करणे, नोकरी सोडून पुन्हा अभ्यास करणे आणि सरकारी सेवेत निवड मिळवणे यासाठी कुटुंबाचा आधारच सर्वात मोठा बळ ठरला.तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श
आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक तरुण निराश होतात, दिशा हरवतात. अशा वेळी सुशांत यांचा संघर्षमय प्रवास आणि ध्येयाकडे न थांबता चालत राहण्याची वृत्ती प्रेरणादायी ठरते. ग्रामीण भागात मर्यादित साधने असतानाही, योग्य दिशा, जिद्द आणि कुटुंबाचा आधार असेल तर कोणतेही मोठे लक्ष्य साध्य करता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.सोनेवाडीचा हा तरुण आता राज्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेत कार्यरत होत असून, समाजासाठी विज्ञानाच्या माध्यमातून सेवा देण्याचा त्यांचा निर्धार अधिक दृढ झाला आहे.


