
कोपरगाव प्रतिनिधी
मागील वर्षी पावसाळ्यात समाधानकारक पर्जन्यमान झाल्यामुळे चालू वर्षी सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली होती. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केलेली मागणी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील ह्यांनी मान्य केली होती. त्या मागणीनुसार सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तना बरोबरच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सिंचनाचे देखील आवर्तन होणार असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी दिली आहे.
०६ डिसेंबर २०२५ मध्ये राहाता येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाटबंधारे विभागाने एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन देण्यास सहमती दिली होती. मात्र पाण्याची जास्तीत जास्त बचत करून तीन आवर्तनाचे चार आवर्तन करावे अशी आग्रही मागणी आ.आशुतोष काळे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असता त्या मागणीला जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.त्यानुसार सध्या उन्हाळी आवर्तन सुरु आहे. गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उणीव भासू नये यासाठी आ.आशुतोष काळे सातत्याने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे गोदावरी कालव्यांना नियमितपणे वेळेवर आवर्तन सोडले जात असून पिण्याच्या पाण्याचे व सिंचनाचे योग्य नियोजन झाले आहे.
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम उरकल्यानंतर शेतात उभ्या असलेल्या चारा पिकांना, ऊस व फळबागांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता व जून महिन्यात सुरुवातीलाच पाऊस सुरु होईल असा अंदाज हवामान खात्याने दरवर्षीपेक्षा अगोदरच दाखल झालेल्या मान्सूनच्या आगमनामुळे वर्तविला होता. परंतु मान्सूनची सुरु असलेली वाटचाल रखडल्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस न पडता उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली असून साहजिकच त्याचा फटका उभ्या पिकांना बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही याची जाणीव असणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी देखील पाणी देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे ज्या ज्या लाभधारक शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी पाण्याची मागणी येईल त्या त्या शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी सांगितले आहे.


