Friday, April 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedमंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत व उच्च दर्जाचे करा!!-आ. आशुतोष काळेंच्या सूचना

मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत व उच्च दर्जाचे करा!!-आ. आशुतोष काळेंच्या सूचना

कोपरगाव प्रतिनिधी

मंजूर येथील कोल्हापूर टाईप बंधारा एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन वेळेस पुराच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले होते.त्यामुळे या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या बंधाऱ्याचे शाश्वत व टिकाऊ काम करण्यासाठी निधी देणार असल्याचा शब्द मंजूर बंधाऱ्याच्या लाभधारक क्षेत्राच्या गावातील शेतकऱ्यांना दिला होता. त्या शब्दाची पूर्तता करून राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून ४१ कोटी रुपये निधी मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दिला आहे.अशा मोठ्या कामांसाठी शासनाकडून वारंवार निधी मिळत नाही. त्यामुळे मिळालेल्या निधीतून मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत व उच्च दर्जाचे करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना व संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.
आ.आशुतोष काळे यांनी बुधवार (दि.०७) रोजी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व मंजूर बंधाऱ्याच्या लाभक्षेत्राच्या गावातील शेतकऱ्यांच्या समवेत मंजूर बंधाऱ्याच्या सुरु असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी सुरु असलेल्या कामाचा पाटबंधारे विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदाराकडून माहिती जाणून घेत आढावा घेतला यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मंजूर,चास नळी, हंडेवाडी, धामोरी, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर आदी गावातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेला मंजूर बंधारा तीन वेळेस वाहून गेल्यामुळे मंजूर बंधाऱ्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे मागील काही वर्षापासून बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. शेतकऱ्यांना पडलेल्या चिंता पाहून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बंधाऱ्याची दुरुस्तीसाठी निधी देण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. अशा मोठ्या कामांसाठी पुन्हा पुन्हा शासनाकडून निधी मिळेल याची शाश्वती नाही. मंजूर बंधारा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून माझ्याप्रमाणे शेतकऱ्यांचे देखील सुरु असलेल्या कामावर बारीक लक्ष आहे. त्यासाठी सुरु असलेले काम वेळेत तर झालेच पाहिजे त्याचबरोबर हे काम उच्च दर्जाचे देखील होणे तेवढेच गरजेचे आहे.जेणेकरून कायमस्वरूपी या बंधाऱ्यात पाणी साठविले जाईल व कितीही मोठा पूर आला तरी मंजूर बंधारा अभेद्य राहील याची काम करतांना काळजी घ्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी कार्यकारी अभियंता ग.प्र. हारदे, सहाय्यक अभियंता स.ना. देशमुख, कॉन्ट्रॅक्टर श्री. यादव आदींसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व मंजूर,चास नळी, हंडेवाडी, धामोरी, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.
मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा खर्च जरी मोठा असला तरी मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे आव्हान स्वीकारले होते. दिलेला शब्द पूर्ण करायचाच या उद्देशातून मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी किती आणि कसा पाठपुरावा केला हे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी कोपरगाव येथील जाहीर सभेत सांगितले आहे. त्यांच्या सहकार्यातून मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी महायुती शासनाकडून तब्बल ४१ कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत.-आ. आशुतोष काळे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!