
कोपरगाव प्रतिनिधी
तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या व इतर मागण्यांचे निवेदन ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना देण्यात आले.
किसान काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सुधाकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. काही भागात पूरस्थिती तर काही भागात दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात तेलंगणाप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी सिबिलच्या जाचक कक्षेतून वगळावे व त्यांना नवीन पीक कर्ज मंजूर करावे, कांदा हमीभावाने खरेदी करावा, घोषित केलेले अनुदान द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर विजय जाधव यांच्यासह संदीप मालकर, बाळासाहेब देवकर, राजेश देवकर, अमोल देवकर, दिनेश केकाण, गौरव देवकर, सचिन देवकर, अनिल सोमासे, दिनकर मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


