
जेऊर कुंभारी वार्ताहर
जिद्द, कष्ट आणि अथक परिश्रमांच्या बळावर आपल्या कार्याच्या यशोशिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम असलेल्या निवडक कर्तुत्ववान व्यक्तींचा सन्मान 'लोकमत' या वृत्तपत्र समूहातर्फे शनिवार दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी लोकमत भवन अहमदनगर येथे अतिशय दिमाखदार समारंभात करण्यात आला. 'लोकमत' हे वृत्तपत्र म्हणून समाजासाठी नेहमीच इतरांपेक्षा वेगळी आणि ठोस भूमिका मांडत आला आहे. समाजासाठी काहीतरी करू पाहणाऱ्यांना "लोकमत एक्सलन्स अवॉर्ड २०२४" हा पुरस्कार देऊन गौरविण्याची ही कल्पना नक्कीच ऊर्जा देणारी आहे.शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे अण्णा यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अतिशय धीरोदत्तपणे पुढे चालवणारे त्यांचे सुपुत्र मा. संजयजी नागरे सर म्हणजे शिक्षणाप्रती अखंड ध्यास असलेलं वृतस्थ व्यक्तिमत्व...! आजच्या युगात शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात निर्मिती व सर्जनशीलतेला प्राधान्य देऊन शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारक्षशील व कौशल्यपूर्ण सक्षम पिढी घडविण्याच्या उदात हेतूने कोपरगाव तालुक्याच्या शैक्षणिक क्षितिजावर आपल्या नाविन्याचा ठसा उमटवणाऱ्या रेनबो इंटरनॅशनल स्कूल ची स्थापना जेऊर कुंभारी सारख्या ग्रामीण भागात करण्याची कल्पना स्व. अण्णांच्या मनात रुजली. श्रीमंतीची मक्तेदारी असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाची कवाडे ही ग्रामीण भागातील, सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब मुलांना सहजासहजी उपलब्ध व्हावीत ही आशा बाळगून १२ वर्षांपूर्वी संजय नागरे सरांनी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली रेनबो इंटरनॅशनल स्कूल ही सीबीएसई शाळा सुरू केली. ही त्यांच्या सामाजिक बांधिलकीची खरी तळमळ होय. शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे अण्णांच्या ज्ञानाचा हा वटवृक्ष अधिकाधिक विस्तारण्याचं काम मा. संजयजी नागरे सर आजपावेतो खूप नेटाने करत आहेत. रेनबो इंटरनॅशनल स्कूलची मुख्य शाखा तसेच शिर्डी व कोपरगाव पूर्व प्राथमिक विभाग आज शिक्षण, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात आपला विलक्षण ठसा उमटवत आहेत. या यशामागे त्यांच्या ठायी असणाऱ्या विशेष नेतृत्वगुणांचा संदर्भ व आई-वडिलांचा समर्थ आशीर्वाद आहे.शिक्षण क्षेत्रात कार्य करीत असताना प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञानाबरोबरच सुसंस्कृत व आव्हान पेलण्यात सक्षम व जबाबदार झालाच पाहिजे. त्यांच्या अंगी स्वावलंबन रुजवून कौशल्य निर्माण व्हावीत, यासाठी विविध शैक्षणिक व नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ते सतत प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. 'लोकमतच्या' माध्यमातून त्यांचे कार्य केवळ कोपरगाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आणि राज्यातही पोहोचले आहे. याप्रसंगी मा. संजयजी नागरे सरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, 'लोकमत' सारख्या नामांकित वृत्तपत्राकडून कामाची दखल घेतली जाणे हे खूप अभिमानास्पद आहे. त्यामुळे समाजासाठी सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते. परंतु आता जबाबदारी वाढली असून, आणखी उत्कृष्ट काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष मा. कांतीलालजी अग्रवाल शेठ, विश्वस्त मा. मनोजजी अग्रवाल, मा.आनंदजी दगडे, सौ. वनिताताई नागरे, कार्यकारी संचालक मा. आकाशजी नागरे, शैक्षणिक संचालक मा. नानासाहेब दवंगे, उपप्राचार्य श्री निलेश औताडे, कार्यालय प्रमुख श्री रवींद्र साबळे, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक यांनी मा. संजुभाऊ नागरे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


