


कोपरगाव प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानमळा येथे चांदेकसारे ग्रामपंचायत सदस्या मा.सौ.सुवर्णाताई मनोज होन यांच्या अध्यक्षतेखाली बालआनंद मेळावा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत वैयक्तिक भाषण स्पर्धा,गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कलाकुसरीच्या वस्तू बनविणे स्पर्धा, विज्ञान साहित्य स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच मुलांचे व्यावहारिक ज्ञान वाढविणारा उपक्रम भाजी बाजार भरवून वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला गेला.त्याचबरोबर माता पालक यांच्या पाककृती स्पर्धा व छोटे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्या मा.सौ.सुवर्णाताई मनोज होन मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, विद्यार्थी हा समाज व राष्ट्र घडविणारा महत्वाचा घटक आहे.मुलांनी आजच्या स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे व पालकांनी ही आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. वेळोवेळी मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे.या कार्यक्रमा वेळी शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी मा.श्रीमती शबाना शेख मॅडम यांनी सांगितले की,मुलांनी प्रत्येक उपक्रमात सहभागी झाले पाहिजे व शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच माता पालक समितीच्या अध्यक्षा सौ.स्वाती बापूसाहेब नन्नवरे व सर्व पालक माता, शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीमती कुळधरण मॅडम यांनी केले तर आभार श्रीमती गोर्डे मॅडम यांनी मानले.


