

जेऊर कुंभारी वार्ताहर
शिक्षणमहर्षी स्व.लहानुभाऊ नागरे अण्णा स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव दि. १५,१८,१९ डिसेंबर २०२३ या कालावधीत रेनबो शैक्षणिक संकुलात अतिशय जल्लोषात संपन्न झाला. मुलांना दर्जेदार शिक्षणासोबतच त्यांच्यातील क्रीडानैपुण्य खेळाच्या मैदानावर दाखवण्याची संधी उपलब्ध व्हावी, तसेच क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शालेय दशेतच एकोपा, बंधुता व समता ही मूल्य रुजावीत या उदात्त हेतूने दरवर्षी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते.
दि.१९ डिसेंबर २०२३ रोजी स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त वनपरिक्षेत्रपाल अधिकारी( महाराष्ट्र शासन) मा. बालकृष्ण आव्हाड साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर संस्थेचे सचिव मा. संजयजी नागरे सर, कार्यकारी संचालक मा. आकाशजी नागरे सर, शैक्षणिक संचालक मा. नानासाहेब दवंगे सर, उपप्राचार्य मा. निलेश औताडे सर, कार्यालयीन प्रमुख मा. रवींद्र साबळे सर, समन्वयक स्मिता देशमुख, मोनाली सुराळे, शिर्डी पूर्व प्राथमिक विभागाच्या सीएलओ नेहा गुप्ता तेजल आभाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी आदरणीय अण्णांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलन करून झाली.प्रमुख अतिथी मा. बालकृष्ण आव्हाड साहेब यांचा यथोचित सत्कार शाळेच्या वतीने कार्यकारी संचालक मा. आकाश नागरे सर यांनी केला.
तीन दिवस चाललेल्या या वार्षिक क्रीडा महोत्सवात १००,२००,४०० मीटर व रिले अशा धावण्याच्या शर्यती, लांब उडी,गोळा फेक, थाळीफेक, खो - खो, कबड्डी अशा विविध मैदानी खेळांचा समावेश होता. तर प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाच्या विविध मनोरंजनात्मक खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. चार सदन व चार गट अशा स्वरूपात हा क्रीडा महोत्सव संपन्न झाला. सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह, सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक तसेच प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कराटे प्रशिक्षक विकास सावंत व वर्षा देठे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके व पिरॅमिड मनोरे बनवून उपस्थितांची वाहवा मिळवली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैक्षणिक संचालक मा. नानासाहेब दवंगे सर म्हणाले, आरोग्य हा मुलांच्या सर्वांगीण विकासामधील एक महत्त्वाचा घटक आहे. मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर, त्यांचे स्वास्थ चांगले असणे आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांचेच कष्ट कमी झाले आहेत. त्यामुळे आज सर्वच वयोगटातील व्यक्तीवर निरनिराळे ताणतणाव दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी समाजामध्ये अनेक आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आपण आपल्या शालेय जीवनात अभ्यासाबरोबरच खेळालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. बालकृष्ण आव्हाड साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आजच्या धावपळीच्या युगात आरोग्यासाठी आणि तुमच्या पुढील जीवनाच्या वाटचालीसाठीही खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. आज देश पातळीवर विविध शासकीय नोकऱ्या मिळवताना या खेळाच्या सर्वांगीण विकासातच विविध स्तरावर चमकलेल्या खेळाडूंना अधिकारी पदाच्या शासकीय नोकरी मिळत आहेत. या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घेणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक श्री भामरे सर, विकास सर, वर्षा देठे तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले. कार्यक्रम पाहण्यासाठी बहुसंख्य विद्यार्थी - विद्यार्थिनी व त्यांचे पालक तसेच माजी विद्यार्थीही आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक नैतिक निकुंभ व वंश जैन या विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन समृद्धी माकोणे व सोहम लोढा या विद्यार्थ्यांनी केले तर आभार परवीन कुरेशी यांनी व्यक्त केले. संपूर्ण स्पर्धेचे धावते समालोचन फरीद पटेल यांनी अतिशय उत्कृष्ट केले.
परीक्षेतील गुण म्हणजे पुढील आयुष्यात यश आणि समाधान मिळवण्याचा एकमेव मार्ग मुळीच नाही. जीवनात यश प्राप्त करायचे असेल तर वेळेचे नियोजन, समूहात काम करण्याची क्षमता, स्वतःच्या व इतरांच्या भावना समजणे, नेतृत्व गुण असणे, ताणतणाव हाताळता येणे यासारखी अनेक जीवनकौशल्य अंगी असावी लागतात. ही सर्व कौशल्ये मैदानावर समूहात खेळतांना आपोआपच अंगी बानली जातात. विकसित होतात. रेनबो स्कूलचे हेच वैशिष्ट्य आहे की इथे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न घडवला जातो.
संस्थेचे चेअरमन मा. कांतीलालजी अग्रवाल, विश्वस्त मा. मनोजजी अग्रवाल, मा. आनंदजी दगडे, आदी पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.





