जेऊरकुंभारी :- येथील दलित वस्ती विकासासाठी भरघोस निधी येऊनही या निधीचा योग्य वापर केला जात नाही.ग्रामपंचायत कार्यालयातुन कामांचे फक्त प्रस्ताव तयार केले जातात परंतु कामाची अंमलबजावणी मात्र होत नाही. याचा अर्थ कुणीतरी या विकास कामाला खोडा घालत आहे. तरी अशा झारीतील शुक्राचार्याचा शोध घ्यावा अशी मागणी शशिकांत वक्ते यांनी
केली आहे.

जेऊर कुंभारी गावातील विकास कामे रद्द
सन २०१८- २०१९ या काळात मारूती मंदिर ते दलित वस्तीत सिडी वर्क काँक्रिटीकरण हा रस्ता करण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी होती.या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. रस्त्यावर खड्डे पडले होते. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना या रस्त्याचा वापर करता येत नाही.या रस्त्याच्या कामासाठी शासनाने दलित वस्ती सुधार योजनेतून भरघोस निधी दिला होता मात्र, कुणीतरी स्वतःची पोळी भाजण्यासाठी झारीतील शुक्राचार्य बनून काम रद्द करण्यात आल्याची गावभर दबक्या आवाजात चर्चा आहे प्रकार कळताच गावातील युवकांनी एकत्र येत ग्रामपंचायतला जाब विचारला. मात्र याबाबत उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे युवकांनी पंचायत समितीकडे धाव घेऊन विचारणा केली असता हे काम गावातुन रद्द करण्यात आल्याचे कळले. मात्र हा झारीतील शुक्राचार्य कोण? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. गावातील घाणेरड्या राजकारणामुळे दलित वस्तीची कामे जर होत नसतील तर ग्रामपंचायत फक्त विकासाचे ढोंग करत आहे की काय ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्यांना विचारणा केली असता
गावठाण व संजयनगर या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्या बाबत तुम्हाला माहित आहे का? असा उलट प्रश्न विचारला जातो. मुळातच कोणत्याही विकासकामासंदर्भात ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही अशी माहिती मिळाली आहे.मारुती मंदिर पिओर ब्लॉक चे देखील काम अशाच पद्धतीने रद्द करण्यात आले
यावरून असे दिसते की ठराविक भागातच ग्रामपंचायत
जाणून बुजून काम करत आहे. सदस्यांना देखील विचारले असता ते नेहमी अनुउत्तरीत असतात. फक्त जिरवा जिरवी चे राजकारण चालु असल्याचे दिसते, जिरवा जिरवी मध्ये गाव विकास काहीच होताना दिसत नाही हे चित्र अनेकदा दिसून येत आहे.
त्यामुळे दलित वस्तीच्या विकासाला बाधा आणणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी शशिकांत वक्ते यांनी केली आहे.



