

नाटेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरूवार दि.१६ नोव्हेंबर रोजी तब्बल वीस वर्षानंतर पुन्हा एकदा चौथीचा वर्ग भरला.
आई-वडिलांनंतर खऱ्या अर्थाने आयुष्याचा पाया भक्कम करणारे गुरु म्हणजे आपले शिक्षक, शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे आद्य कर्तव्य असते अशाच उदात्त भावनेतून भरविण्यात आलेला माजी विद्यार्थी मेळावा हा नाटेगावच्या मराठी शाळेच्या प्रांगणात अगदी मोठ्या उत्साहाने पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष म्हणून लाभलेले जोशी दाम्पत्य यांची उपस्थिती अनमोल ठरली.
शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्यात प्रत्येकाने सतत विवेक बुद्धीने वागले पाहिजे याची सुरुवात म्हणून शिवछत्रपतींच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून जोशी दाम्पत्यांनी दीपप्रज्वलन करून अध्यक्ष स्थान स्वीकारले.
आज इतक्या वर्षांनी आपण सर्वजण पुन्हा एकत्र आलो यासाठी देवाचे आभार मानत शिक्षिका जोशी यांनी सुंदर प्रार्थना घेतली.
पुन्हा एकदा चौथीचा वर्ग भरत असताना जोशी सरांनी मुलांची हजेरी घेत जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला.
कार्यक्रमात यावेळी सर्व मुला मुलींनी परिचय करून देत आपण सध्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहोत याची माहिती करून देत लाभलेल्या शिक्षकांना सुखाचे अनुभव दिले.
पहिली ते तिसरी पर्यंत एकही शिक्षक न लाभलेल्या या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात जोशी सर आणि जोशी ताई यांचे आगमन झाले आणि सर्वांच्याच आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. प्रत्येकाने च या शिक्षक जोडीचे आभार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. खऱ्या अर्थाने आयुष्याचा पाया भक्कम केला तो जोशी दांम्पत्याने
पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना जोशी सर म्हणाले की तुमचा गुरु आणि शिक्षक या नात्याने एक गोष्ट सांगेन की जीवनात कधीच व्यसन करू नका करायचे असल्यास चांगल्या विचारांचे करा चांगल्या सवयींचे करा.
आजचे युग हे पैशावर चालणारे आहे परंतु पैसा व्यर्थ वाया घालवू नका.
कोरोना सारख्या महामारी ने दाखवून दिले की आयुष्य आणि माणसं किती क्षणभंगुर आहेत.. आहे तोपर्यंत माणुसकीने जगा एकमेकांना सहाय्य करा एकमेकांच्या दुःखात सहभागी व्हा असे जोशी यांनी सांगीतले अगदी हसत खेळत पार पडत असलेल्या या माजी विद्यार्थी मेळाव्यास विठ्ठल मोरे, किरण मोरे, किरण वहाडणे, अमोल मोरे, प्रमोद मोरे, जनार्दन मोरे, राहुल भोरकडे, राहुल देवरे, राजेंद्र मोरे, गोकुळ मोरे,मनीषा मोरे, अनिता मोरे, आरती पगारे, रूपाली मोरे, जितेंद्र मोरे, भूषण वाणी, कैलास मोरे, प्रदीप वाघ, गणेश घोरपडे, लक्ष्मण मोरे, दीपक मोरे, समाधान कुर्हाडे,रामकिसन मोरे , आदी माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी सौ मीना वर्पे- शिंदे हिने केले तर सचिन राजुडे या विद्यार्थ्याने आभार व्यक्त केले.
पाहुणे म्हणून उपस्थित शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पाडत असताना केक कापून तसेच सुग्रास जेवणाचा आनंद घेत या कार्यक्रमाची सांगता झाली आणि शाळा सुटली पुन्हा एकदा पाखरे आठवणींचा ठेवा स्वतःकडे घेत घरट्याकडे परतली.


