
कोपरगाव प्रतिनीधी
८ व्या आयुर्वेद दिनानिमित्त आयुष मंत्रालय भारत सरकार तर्फे दिला जाणारा भारतीय वैद्यक क्षेत्रातील मानाचा राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार कोपरगाव येथील राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास म्हाळूजी आव्हाड यांना हरियाणा येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
रोख पाच लाख रुपये, मानपत्र, शाल, कलश, श्री. धन्वंतरी मूर्ती, स्मृतिचिन्ह असे स्वरूप असलेला हा पुरस्कार दरवर्षी आयुर्वेद क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या भारतातील फक्त तीन आयुर्वेद डॉक्टर्स ला दिला जातो. धन्वंतरी जयंती व ८ व्या आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार आयुर्वेद प्रचार प्रसार साठी भारत व भारताबाहेरील केलेल्या कार्याची दखल स्वरूप हा पुरस्कार दिला जातो.
केंद्रीय आयुष मंत्री सरबानंद सोनोवाल यांच्या शुभहस्ते व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.महेंद्रभाई मुंजपारा, हरियाणा विधानसभा अध्यक्ष ग्यानसिंग गुप्ता, सीसीआयएम चे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी, भारताचे आयुर्वेद सल्लागार डॉ. मनोज नेसरी, राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ प्रशासक समितीचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. देवेंद्र त्रिगुणा, हरियाणा सरकार सल्लागार डॉ. अनुपमा, आयुष सेक्रेटरी डॉ. राजेश कोटेचा आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष डॉ. राकेश शर्मा यांच्यासह अनेक शासकीय उच्चपदस्थ अधिकारी व २००० हून अधिक वैद्यगणांच्या उपस्थितीत यंदा हा भव्य सोहळा पंचकुला हरयाणा येथे धनत्रयोदशी शुक्रवार दि १० नोव्हेंबर रोजी संपन्न झाला.
यावर्षी प्रथम क्रमांकाची पसंती कोपरगाव येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व गेल्या आठ वर्षांपासून राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ दिल्ली तर्फे आठव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून नियुक्ती झालेले डॉ. रामदास आव्हाड यांना मिळाली. त्यांच्याबरोबर डॉ. पांचाभाई दमानिया (गुजराथ) व डॉ. माधवन (त्रिवेंद्रम) यांचीही या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून निवड झाली.
आयुर्वेद क्षेत्रातील भारत सरकार तर्फे दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. यापूर्वी ही गेल्या ३५ वर्ष्यापासून कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात राहून रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. आव्हाड यांना ४० हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत, निस्वार्थ मनाने व प्रामाणिक पणे आयुर्वेद केल्याचे हे फळ असून ग्रामीण भागात राहणाऱ्या माझेसारख्या सामान्य वैद्याचीही दखल घेतली जाणे हे भाग्याबरोबरच कौतुकास्पद ही असल्याचे डॉ. आव्हाड प्रतिक्रियेत म्हणाले. आजपर्यंत डॉ. आव्हाड श्रद्धेने, विश्वासाने व प्रामाणिकपणे करत असलेल्या आयुर्वेद रुग्णसेवेचे हे फळ असल्याची प्रतिक्रिया हजारो हितचिंतकांनी स्वतःहून बोलून दाखवली. सर्व भारत भरातील उच्चपदस्थ व्यक्तीकडूनही अभिनंदन होत असल्याने या पुरस्काराचे महत्व अधिक वाटू लागल्याचे डॉ. आव्हाड यांनी म्हटले.


