
जेऊर कुंभारी (वार्ताहर)
देशातील गोरगरीब नागरीकांना मोफत उपचार मिळावे यासाठी भारत सरकार प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना राबवत आहे. या योजनेचे ओळखपत्र काढून जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे सुधाकर वक्ते यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार सर्वे करण्यात आला होता, परंतु या सर्वेमध्ये त्रुटी आढळून आल्या. हा सर्वे अन्यायकारक होता. मात्र यात सरकारने फेरबदल करून ज्या नागरिकांचे ऑनलाईन नाव आहे त्यांना आयुष्यमान कार्ड काढता येणार आहे. गरीब, मागासलेल्या तसेच दारिद्र्य रेषेखालील लोकांना आरोग्य विमा संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना एक महत्त्वाकांक्षी योजना राबविली आहे. मात्र सन २०११ च्या चुकीच्या सर्वेमुळे ग्रामीण भागातील बहुतेक गरजु लाभार्थी वंचित असल्याचे दिसुन येत आहे. आजही देशात ज्यांना गरिबीमुळे हॉस्पिटलमधील महागड्या उपचारांचा खर्च परवडत नाही अशा लोकांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांना
आर्थिक विवंचनेमुळे आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळेस आयुष्यमान भारत कार्ड उपयोगी येते. कार्ड मिळण्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून सन २०११ च्या जनगणनेनुसार समाविष्ट यादीप्रमाणे नागरिकांना आयुष्यमान कार्ड दिले जात होते, त्यात आता बदल करण्यात आला आहे. ज्या कुटुंबाचे नाव ऑनलाईन आहे अशा व्यक्तींना आयुष्यमान कार्ड काढता येणार आहे. त्यामुळे या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे सुधाकर वक्ते यांनी केले आहे.


