Monday, April 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्नेहलताताई कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर निळवंडेच्या डाव्या कालव्यात वाहिले पाणी; लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी...

स्नेहलताताई कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर निळवंडेच्या डाव्या कालव्यात वाहिले पाणी; लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी मानले आभार

कोपरगाव प्रतिनिधी
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याची गरज असताना कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर निळवंडे धरणातून डाव्या कालव्यात आज गुरुवारी (दि.२ नोव्हेंबर) पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडेच्या डाव्या कालव्यात पाणी सोडल्यामुळे तालुक्यातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, वेस, सोयगाव, बहादरपूर, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबादसह मतदारसंघातील वाकडी, चितळी, धनगरवाडी या जिरायती गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून, पाणी सोडल्याबद्दल राज्य शासनाचे तसेच यासाठी शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या स्नेहलताताई कोल्हे यांचे निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आभार मानले आहेत.
नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, श्रीरामपूर तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या सात तालुक्यांतील १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे काम तब्बल ५३ वर्षांनंतर पूर्ण झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ ऑक्टोबरला त्याचे उद्घाटन व लोकार्पण झाले आहे. निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे एकूण ६८,८४८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, हा भाग सुजलाम् सुफलाम् होणार आहे. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात सन २०१६-१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निळवंडे धरणाच्या कामाला चालना दिली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे निळवंडे धरणाचे व डावा कालव्याचे काम गतीने पूर्ण झाले. यंदा कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या निळवंडेच्या डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांचे व जनावरांचे पिण्याच्या पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
निळवंडे डाव्या कालव्याच्या वितरिकांचे काम अद्याप चालू असल्याने कालव्यांच्या लाभक्षेत्रातील गावांची भूजलपातळी वाढावी यासाठी कालव्याच्या आवर्तनातून या भागातील तलाव, बंधारे भरून देण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार स्नेहलताताई कोल्हे यांनी निळवंडेच्या डाव्या कालव्यात गुरुवारी (२ नोव्हेंबर) जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता विवेक लव्हाट, महेश गायकवाड, सहाय्यक अभियंता कदम यांच्या उपस्थितीत नारळ फोडून पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडे धरणाचे पाणी येण्याचे पाच दशकांपासूनचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे कोपरगाव मतदारसंघातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, वेस, सोयगाव, बहादरपूर, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद, वाकडी, चितळी, धनगरवाडी या जिरायती गावातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तसेच निळवंडे डाव्या कालव्यात पाणी सोडण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या स्नेहलताताई कोल्हे यांचे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आभार मानले आहेत.
स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, आजचा दिवस हा निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील जनतेसाठी आनंदाचा दिवस आहे. जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हेसाहेब यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ११ गावांचा निळवंडेच्या लाभक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. निळवंडेच्या डावा कालव्याद्वारे आज लाभक्षेत्रात पाणी आल्याने स्व. कोल्हेसाहेब व गेल्या पाच दशकांपासून जिरायती भागातील शेतकऱ्यांनी गेली अनेक वर्षे पाहिलेले स्‍वप्‍न अखेर आज पूर्ण झाले आहे याचा मला मनस्वी आनंद आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!