
कोपरगाव एसटी आगार प्रशासनाला काँग्रेसचा इशारा!!
कोपरगाव प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव बसस्थानक नावलौकिक म्हणून ओळखले जाते. मात्र ग्रामीण भागाचा दळणवळणाचा महत्त्वाचा कणा ठरणारी बससेवेच्या आगारातील प्रशासनाकडून बसेस चे योग्य नियोजन न केल्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रवासाची मोठी गैरसोय होत आहे. बस सेवा वेळेवर न देणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जखमीवर मीठ चोळल्यासारखेच आहे. विद्यार्थी व प्रवाशांची अडचण तातडीने सोडविण्यात बसस्थानक व्यवस्थापकने योग्य नियोजन करावे अन्यथा काँग्रेसचे वतीने मोठे जनआंदोलन उभे केले जाईल असा इशारा कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी दिला आहे.
बसेस नियोजित वेळेवर न सुटणे, नियोजित वेळेपेक्षा आधी बस निघून जाणे, बस फेरी रद्द होणे तर अनेकदा रस्त्यात बस बंद पडणे अश्या अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. अनेक गावांमध्ये बस थांबा असताना थांबत नाही, असे अनेक प्रकार होत असल्याने शिक्षण, नोकरी आदी कामकाजासाठी विद्यार्थ्यांसह प्रवासी यांची शहरात तसेच बाहेरगावी प्रवास करण्यासाठी गैरसोय होत असुन त्यांना सुविधा असताना देखील खासगी वाहनांच्या माध्यमातून मदत घेवुन शाळेत व महाविद्यालयात वेळेवर पोहचावे लागत आहे व वेळवर न पोहोचल्यास विद्यार्थ्यांची गैरहजेरी लागत आहे.ग्रामीण भागातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कोपरगाव आगाराच्या उत्पन्नातले महत्त्वाचे घटक आहेत. मात्र यांना वेळेवर बस सेवा मिळत नसल्याने महिला, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, नोकरीच्या ठिकाणी काम करणाऱ्या तसेच इतर प्रवासी यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने सर्वच स्तरातून नाराजीचे प्रमाण वाढले आहे.
शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच कामासाठी जाणारी व्यक्ती दर महिन्याला पास सुविधा घेत असताना त्यास सुविधा मिळत नसल्याने बस सेवेचा व पासचा उपयोग तरी काय ? बस आगाराचा ढेपाळलेला कारभार सर्वांसाठी त्रासदायक ठरत आहे. प्रशासनाने देखील लक्ष न घातल्यास काँग्रेसच्या वतीने मोठे जनआंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी दिला आहे.


