Tuesday, April 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedरेनबो स्कूल मध्ये स्वच्छता मोहिम उत्साहात संपन्न!!

रेनबो स्कूल मध्ये स्वच्छता मोहिम उत्साहात संपन्न!!

जेऊर कुंभारी वार्ताहर

शिक्षणमहर्षी स्व. लहानुभाऊ नागरे अण्णा स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूल, जेऊर कुंभारी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५४ वी जयंती व त्यासोबतच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. संजयजी नागरे, कार्यकारी संचालक मा. आकाशजी नागरे, संचालक मा. नानासाहेब दवंगे सर, उपप्राचार्य मा. निलेश आवतडे सर, कार्यालयीन प्रमुख मा. रवींद्र साबळे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

संपूर्ण जगाला “सत्य व अहिंसेचा” मार्ग दाखवणाऱ्या बापूंना व देशाला “जय जवान जय किसान” हा कृषी प्रधानतेचा स्फूर्तीदायी मंत्र देणाऱ्या शास्त्रीजींना मान्यवरांनी अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व मान्यवरांचा परिचय करून देताना जीएम पगारे यांनी महात्मा गांधीजींच्या असामान्य व्यक्तिमत्त्वातील काही पैलू उलगडतांना सांगितले की, त्यांच्या विचारात निर्मळपणा होता… शब्दा शब्दात भारतमातेवरची माया होती… रक्ताच्या थेंबा थेंबात आपल्या मातीतल्या गोरगरिबांसाठीची आस होती, मानवतेची कास होती, सत्याची ताकद होती.

दत्ता डोखे यांनी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसमवेत “रघुपति राघव राजाराम….” हे भजन गाऊन वातावरण भक्तीमय केले. यानंतर सातवीच्या विद्यार्थ्यांनी “मोहन से महात्मा” ही बापूजींच्या जीवनावर प्रकाश टाकणारी नाटिका सादर केली. यामध्ये दुसरीचा विद्यार्थी प्रणील कातकडे याने साकारलेल्या महात्मा गांधींच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले. परवीन कुरेशी, प्रीती शेखो, संकेत गोडगे ह्या शिक्षकांसह स्वरा रोहमारे विद्यार्थिनीने या नाटिकीचे दिग्दर्शन केले होते. कार्यक्रमानंतर ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी, कर्मचारी व शिक्षकांनी शाळेचा परिसर साफ करुन बापूंना ‘स्वच्छांजली’ अर्पण केली आणि स्वच्छ भारत अभियान मध्ये सहभागी झाले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना उप प्राचार्य श्री निलेश औताडे सर म्हणाले, “अहिंसा परमो धर्म:” आत्मसात करून बापूंनी आपल्या हयातीतच या विचाराची ताकद जगाला दाखवून दिली. अहिंसक सत्याग्रहाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीत मोलाचं योगदान देऊन बापूंनी देशाला आणि जगाला अहिंसेचा विचार पटवून दिला. तसेच, लालबहादूर शास्त्री यांचा “जय जवान जय किसान” हा नारा आजही शेतकऱ्याला स्फूर्ती देतो.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अदिती घुले व इनाया पठाण या विद्यार्थिनींनी केले तर आभार मोनाली सुराळे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्रीती शेखो मॅडम यांनी केले होते.
राष्ट्रभक्तीने पुलकित झालेल्या या कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मा. कांतीलालजी अग्रवाल, विश्वस्त मा. मनोज अग्रवाल, मा.आनंद दगडे व सौ. वनिताताई नागरे आदि पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!