
कोपरगाव तालुका काँग्रेसचा मराठा आरक्षण उपोषणास जाहीर पाठिंबा
कोपरगाव प्रतिनिधी –
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. मुळात मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही राज्यातील सर्व समाजाची मागणी आहे. हक्काच्या मागण्यासाठी आंदोलन उपोषण सुरू असुन त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी ॲड. योगेश खालकर, अनिल गायकवाड व विनय भगत हे मराठा बांधव सोमवार (दि.११) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या या आमरण उपोषणाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य महिला आयोग सदस्या उत्कर्षाताई रुपवते यांच्या उपस्थितीत कोपरगाव तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी अधिकृत पत्र देवून जाहीर पाठींबा दिला. यावेळी तालुका सरचिटणीस रवींद्र साबळे, अल्पसंख्यक अध्यक्ष छोटुभाई पठाण, किसान काँग्रेस अध्यक्ष विष्णु पाडेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आकाश नागरे बोलताना म्हणाले की, आरक्षण बाबत राज्य सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे. न्यायालयात टिकणारे आरक्षण कसे देता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. कोणतेही पाऊल उचलताना इतर समाजावरही अन्याय होणार नाही याची सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. हक्काच्या मागणी पूर्ण होण्यासाठी अनेकांनी आंदोलन केले परंतु मराठा समाज बांधवांवर गुन्हा दाखल करण्यात आले. आंदोलकांवर झालेले गुन्हे तातडीने राज्य सरकारने मागे घेण्यात यावे अशी मागणी कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील लेखी पत्राद्वारे केली आहे.


