
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात आहे. तालुक्यात सातत्याने नैसर्गिक संकटाची मालिका सुरू झाल्याने भाजीपाला असो किंवा कांदा, मका, बाजरी, डाळींब, द्राक्षे या पिकांना योग्य तो भाव न मिळाल्याने तालुक्यात सर्वांची आर्थिक घडी विस्कटली असुन या सर्व परिस्थितीचा विचार करता तालुक्यात “एक गाव, एक गणपती” उपक्रमाला सर्वांनी प्राधान्य द्यावे असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी कोपरगावकराना केले आहे.
तालुक्यात शेतकरी वर्गासह लहान मोठे व्यवसाय करणाऱ्या व्यापारी वर्गात देखील नैराश्य चे वातावरण आहे. शासनाने देखील तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा अशी मागणी तालुक्यातुन केली जात आहे. अशा स्थितीमध्ये यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार असून प्रशासनाने सर्वच गावांमध्ये “एक गाव, एक गणपती” ही संकल्पना राबवून जनजागृती करावी. काही जिल्ह्यांमध्ये “एक गाव, एक गणपती” संकल्पना राबविण्यात येते विशेष म्हणजे ग्रामीण भागातील सर्वार्थाने उपयुक्त असा ‘एक गाव एक गणपती’चा उपक्रम आता लक्षवेधी ठरू लागला आहे. उत्सवासाठी जमा होणारी रक्कम ही गावच्या विधायकामासाठी वापरण्यात येते त्याच पद्धतीने कोपरगाव मध्ये गणेश उत्सव मंडळाने प्रयत्न करावे व लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला. त्या उद्देशाला तडा जाऊ न देता या मंडळाच्या माध्यमातून मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे प्रसिद्ध पत्राव्दारे केली आहे.


