
कोपरगाव तालुक्यावर वरुणराजाची अवकृपा ; शेतकरी चिंताग्रस्त!!
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती ते सोयाबीन व खरिपाची इतर पूर्ण पिके जवळपास जळून गेली आहेत. बियाणे व खतांसाठी मोठा खर्च करूनही हा हंगाम वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने योग्य ते नियोजन होणे गरजेचे असुन सरकारने तातडीने सर्व सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठी भरीव मदत करावी अशी मागणी कोपरगाव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी लेखीपत्राद्वारे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.
तालुक्यात दुष्काळाची संकट पुन्हा एकदा गडद होत आहे तालुक्यातील शेतकरी हाताश झाला आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरीही तालुक्यात अद्याप दमदार पाऊस झाला नाही पावसाळ्याचा अडीच महिन्याचा कालावधी कोरडा गेला आहे. ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने पिकांची वाढ खुंटली बहुसंख्य उभी पिके ही जळण्याच्या मार्गावर आहेत. बहुसंख्य शेतकऱ्यांनी खत बी बियाणांवर खर्च करून खरिपाची पेरणी केली आहे यामुळे शेतकऱ्यांचा मोठा खर्च झालाय पण आता शेतात जाऊन पाहिले तर संपूर्ण पीक जळून जात असल्याचे चित्र पाहायला मिळेल. खरीप हंगामात खर्च करून पेरणी केली पण काहीच मिळत नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा हजबल झाला आहे सध्या शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
नुकतेच कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अधिकारी यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न झाला यात शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे जाहीर केले. परंतु सर्व परिस्थिती बघता आताच दुष्काळ पडला आहे. शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने केलेल्या घोषणांवर शेतकऱ्यांना अवलंबून न ठेवता तातडीने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेवून मदत करणे गरजेचं आहे कारण शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली पिके आता डोळ्यादेखत जळून चालली आहे. सरकारने घोषणा करुन देखील कोपरगाव तालुक्यासह राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या संकटात असताना कांदा पिकाचे अनुदान अद्याप जमा झालेले नाही. तातडीने कांदा पिकाचे अनुदान सरकारने शेतकऱ्यांना द्यावे अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल असा इशाराही कोपरगाव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी दिला आहे.
कोपरगाव तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने उभी पिके डोळ्यादेखत जळून जात आहे आणि पावसाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे पावसाळ्याचे अडीच महिने उलटले तरी तालुक्यात कुठेच पुरेसे पाणी पाहायला मिळत नसल्याने शेतकरी व सामान्य नागरिकांत चिंता वाढली आहे.
आकाश नागरे , कोपरगाव काँग्रेस तालुकाध्यक्ष


