




जेऊर कुंभारी वार्ताहर
शिक्षणमहर्षी स्व. लहानुभाऊ नागरे आण्णा स्थापित, रेनबो इंटरनॅशनल स्कूल, जेऊर कुंभारी येथे देशाचा ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी, प्रमुख अतिथी म्हणून विश्वभारती शैक्षणिक संस्थेचे चेअरमन मा. कांतीलालजी अग्रवाल सर, सचिव मा. संजयजी नागरे सर, कार्यकारी विश्वस्त मा. मनोजजी अग्रवाल सर, विश्वस्त मा. आनंदजी दगडे सर व कार्यकारी संचालक मा.आकाशजी नागरे सर तसेच, पालक शिक्षक संघाचे सदस्य मा. प्रशांतजी घुले सर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत मोनाली सुराळे यांनी तर परिचय स्मिता देशमुख यांनी करून दिला.
विद्यार्थ्यांची परेड मार्च स्वातंत्र्यवीरांना स्मरणात ठेवून भारत मातेची प्रतिमा घेऊन व तिरंगा झेंड्याच्या जयघोषात कार्यक्रमास सुरुवात झाली.प्रमुख अतिथी मा. संजयजी नागरे व कांतीलालजी अग्रवाल सर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन सोहळा संपन्न झाला. तमाम भारतीयांच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या तिरंगा ध्वजास सर्वांनी सलामी देऊन कृतज्ञता व्यक्त केली. मान्यवरांचा शाल – श्रीफळ,पुष्पगुच्छ व वृक्ष वाटीका देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर, रेनबो प्री स्कूल शिर्डी, कोपरगाव व मेन ब्रांचच्या चिमुकल्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आपल्या छोटेखानी भाषणात व्यक्त केले. सातवीची विद्यार्थिनी कु. कृष्णा आदिक व आठवीचा विद्यार्थी पार्थ होनकळस यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल आपल्या भाषणात अतिशय स्फूर्तीदायी विचार मांडले. प्री प्रायमरी, प्रायमरी विभाग तसेच शिर्डी ब्रांचच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीने ओथंबलेल्या गीतावर अतिशय नेत्र दीपक नृत्ये सादर केली. यानंतर सर्वांचे लक्ष वेधले ते तायक्वांदो या कराटे प्रकारातील खेळाच्या प्रात्यक्षिकांनी कराटे प्रशिक्षक विकास सावंत तसेच त्यांनी प्रशिक्षित केलेल्या विद्यार्थ्यांनी चित्तथरारक कसरती सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
संस्थेचे सचिव माननीय संजयजी नागरे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विषद करतांना देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांची, हुतात्म्यांची विद्यार्थ्यांना माहिती दिली. आपण सदैव त्यांच्या प्रती कृतज्ञता बाळगली पाहिजे, याची मनाशी खुणगाठ बांधण्याचे आवाहन केले व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य श्री प्रसाद भास्कर सर व कार्यालयीन प्रमुख श्री रवींद्र साबळे सर तसेच समन्वयक निलेश औताडे व दीपक वक्ते यांनी कठोर परिश्रम घेतले. कला शिक्षक दत्ता डोखे यांनी अप्रतिम बॅक ड्रॉप रेखाटून भारतमाते विषयी जाज्वल्य अभिमान निर्माण केला.इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी कु. आदिती घुले, कु. अस्मिता जाधव,कु. पलक ठक्कर कु. इनाया पठाण यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. त्यांना परविन कुरेशी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आबासाहेब शिंदे यांनी केले. यानंतर, विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक वृंद सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या गीताने करण्यात आला.


