

कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी चांदेकसारे डाऊच खुर्द कोकमठाण या भागातील शेतकऱ्यांची खरिप हंगामातील पिके पावसावर अवलंबून आहे. पावसाळा सुरू झाल्यापासुन शेती पुरक व समाधानाकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर घेतलेली खरिपाची पिके सोयाबीन, मका ,कपाशी हि पिके सुकू लागली आहे पाटपाणी वेळेवर न आल्याने विहिरींनी तळ गाठलेले आहे ज्या शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात पाणी शिल्लक आहे ते आधुनिक
सिंचन पद्धतीचा वापर करून पिके जगवण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु वेळेवर पाऊस न झाल्यास खरिपाची पिके हातातून जातील की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.पिकासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे परंतु झालेला खर्च वसुल होतो की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे आता तर ‘येरे येरे पावसा ‘ म्हणण्याची वेळ आली आहे शेतकरी उघडया आभाळाकडे आशेने पहात आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिके घेतली होती परंतु काढणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले होते शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिसकावला गेला त्यावेळी शासनाने शेतकऱ्यांना अनुदान घोषित केले पण वर्ष उलटून गेले तरी कोपरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहे परंतु या वेळी तरी शासन शेतकऱ्यांना नुकसान मदत देणार आहे की नाही असा सवाल भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी उपस्थित केला आहे.


