

जेऊर कुंभारी वार्ताहर
जेऊर कुंभारी येथील हॅरिसन ब्रँच शाळेत कारगिल विजय दिनानिमित्त ‘संवाद माजी सैनिकाशी’ हा उपक्रम राबविण्यात आला.कोपरगाव तालुक्यातील मनेगाव गावचे भूमिपुत्र व कोपरगाव तालुका माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष व माजी सैनिक युवराज हनुमंत गांगवे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे कौतुक करून दिलखुलासपणे उत्तरे दिली. सदर प्रसंगी कोपरगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव वक्ते,सरपंच सुवर्णा पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतिष पवार,चांगदेव वक्ते,शैलेश दळवी तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. युवराज गांगवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना २६ जुलै १९९९ या कालावधीत कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या लढाईला ऑपरेशन विजय हे नाव का देण्यात आले ? भारतीय सैनिक सीमेवर कोणत्या परिस्थितीत राहिले,लढले हे आपल्या ओघावत्या शैलीत कथन करत असताना उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.युवराज गांगवे यांनी सीमेवर लढणाऱ्या पण सणाला कधीही घरी न येणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाबरोबर दिवाळी व इतर सण साजरे करण्याचे आवाहन विद्यार्थ्याना केले.जवानांची आठवण फक्त १५ ऑगस्ट व २६ जानेवारीलाच न काढता त्यांच्या त्यागाची ज्योत आपल्या अंतर्मनात सदैव तेवत ठेवा असे आवाहन केले. त्यांनी पर्यावरण,स्वच्छ्ता याविषयी मार्गदर्शन करून शाळेच्या आवारात स्वखर्चाने आणलेले दोन जांभळाच्या झाडांची रोपे मान्यवरांच्या उपस्थितीत लावली.
सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल पंचायत समिती माजी सभापती शिवाजीराव वक्ते,सरपंच सुवर्णा पवार,चांगदेव वक्ते,मुख्याध्यापिका रंजना डोंगरे,एस. एम. सी.अध्यक्ष सतिष पवार यांनी त्यांचे कौतुक करून आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक नवनाथ सूर्यवंशी यांनी केले तर आभार रंजना डोंगरे यांनी मानले.


